विद्यापीठाच्या संशोधन सल्लागार समितीचा प्रताप; म्हणे, याआधी विपूल संशोधन झालेय नागपूर : ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील समाजचिंतन’ या विषयावर विपूल संशोधन झाल्याचा शेरा देत ‘संशोधन आणि मान्यता समिती’ने (आरआरसी) महाराजांवरील संशोधनाचा विषय चक्क फेटाळून लावला आहे. विद्यापीठ प्रशासन विशिष्ट विचाराच्या प्रभावात असल्याने अशी कृती घडत असल्याचा आरोप होत असून ज्या राष्ट्रसंतांच्या नावावर विद्यापीठ आहे त्या राष्ट्रसंतांवर चार-दोन संशोधने जास्त झालीत तर त्यात वावगे काय आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव देण्यात आले असले तरी हल्ली त्यांच्यावरील संशोधन, अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रकार सर्रास सुरूच आहे. राज्य सरकारने दिलेल्या अनुदानातून तयार करण्यात आलेल्या ग्रामगीता भवनमध्ये विविध विभागांचे अतिक्रमण करण्यात आल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केले होते. आता विद्यापीठाने ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील समाजचिंतन’ या विषयावर संशोधन करण्यास मज्जाव केला आहे. संशोधक विद्यार्थ्यांने पहिल्यांदा आपला विषय संशोधन सल्लागार समिती म्हणजे ‘आरएसी’समोर सादर केला. यावेळी विषयाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांने १७ एप्रिलला झालेल्या ‘आरआरसी’समोर आपला विषयाचे सिनॉप्सीस सादर केले. यावेळी विषयाचे महत्त्व आणि काळानुरूप संशोधनाचे महत्त्व संशोधक विद्यार्थ्यांने पटवून दिले. मात्र, संशोधनाच्या विषयाला मान्यता देण्याचा अधिकार हा ‘संशोधन आणि मान्यता समिती’ला असतो. या समितीने तुकडोजी महाराजांवर अनेकदा संशोधन झाल्याचे सांगून ते ‘आरएसी’कडे परत पाठवले. संशोधनाला मान्यता देणाऱ्या समितीनेच विषय नाकारल्याने तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर संशोधन विद्यापीठालाच नको आहे, असा आरोप होत आहे. ‘यूजीसी’ मान्यतेसाठी प्रयत्न नाही नागपूर विद्यापीठाकडून तुकडोजी महाराज अध्यासन पदव्युत्तर अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी)मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याने विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेऊनही आचार्य पदवी घेता येत नाही, असा आरोप राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यासमंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर रक्षक यांनी केला आहे. यासंदर्भात श्रीगुरुदेव युवामंचाने अनेकदा लेखी निवेदने देऊन कुलगुरूंशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर संशोधन करायची इच्छा असूनही विद्यार्थी ते करू शकत नाही. तुकडोजी महाराजांच्या साहित्य विषयावरील संशोधनाला विरोध होणे हे फार गंभीर आहे. विषयात जर काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करता येतील. मात्र, विषय नाकारणे म्हणजे महाराजांनी सांगितलेल्या एकतेचा आणि जीवन जगण्याच्या मार्गाला नाकारणे होय. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी मोझरी येथील महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपल्या कार्यकाळाला सुरुवात केली होती. मात्र, त्यांना याचा विसर पडल्याचे दिसून येते. - ज्ञानेश्वर रक्षक, सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यासमंडळ.