राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बी.ए.च्या अभ्यासक्रमात महानुभाव साहित्याच्या ग्रंथाचा समावेश सतत राहिला आहे. मात्र, आता तो विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार नाही. बी.ए.च्या अभ्यासक्रमातून महानुभावाचे स्वतंत्र साहित्यच वगळण्याचा प्रताप विद्यापीठ प्रशासनाने केला आहे. यामुळे महानुभाव पंथीयांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत माजी मंत्री सुनील केदारांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची भेट घेत हिवाळी अधिवेशनात आंदोलनाचा इशारा दिला.

हेही वाचा- राज्यात ‘लम्पी’च्या एकूण बळींपैकी ४० टक्के विदर्भात; ४९ हजार पशुधन बाधित

मराठी भाषेच्या शास्त्रोक्त शिक्षणासाठी आजही महानुभाव ग्रंथ साहित्याची अनिवार्यता मान्य केली जाते. यापूर्वी सातत्याने लीळाचरित्र (एकांक), रिद्धपूर चरित्र, स्मृतिस्थळ, दृष्टांत पाठ, महदंबेचे धवळे, महाकवी नरेंद्राचे ‘रुक्मिणी स्वयंवर’ आदी महानुभाव साहित्यातील विविध अभ्यासनीय ग्रंथ बी.ए. मराठी साहित्याच्या अभ्यासक्रमात होते. ते विद्यापीठाने प्रथमच अभ्यासक्रमातून हटवले.

हेही वाचा- भारत-चीन सीमेवर तैनात वणीतील लष्करी अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

त्यामुळे हे साहित्य अचानक कालबाह्य झाले, असे सांगण्याचा विद्यापीठाचा हेतू आहे का, असा सवाल कुलगुरूंना करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय महानुभाव महामंडळाचे पदाधिकारी तसेच माजी मंत्री सुनील केदार, डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. शरयू तायवाडे, आमदार अभिजित वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कुलगुरू व अधिष्ठाता प्राध्यापक वाटमोडे हे साहित्य वगळण्यामागची कारणे सांगू शकले नाहीत, असे शिष्टमंडळाकडून कळविण्यात आले.

हेही वाचा- RSS च्या मुख्यालयावर मोर्चा नेल्याने पोलीस कारवाई, वामन मेश्राम म्हणाले, “लाखो लोकांनी…”

हिवाळी अधिवेशनादरम्यान म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विद्यापीठाविरुद्ध आंदोलन करू असा थेट इशारा शिष्टमंडळाने चर्चेदरम्यान विद्यापीठाला दिला. या शिष्टमंडळात ॲड. तृप्ती बोरकुटे, नरेंद्र खेडीकर, पंकज चींदालोरे, उमेश राऊत, भक्ती बोरकुटे आदींचा समावेश होता.