बांधकाम व्यवसायातील मरगळ दूर; २५ ते ५० लाखांपर्यंतच्या घरांना पसंती

अविष्कार देशमुख, लोकसत्ता

नागपूर : गेल्या तीन वर्षांपासून नागपूरच्या बांधकाम क्षेत्रात मरगळ आली होती. शहरातील विविध भागात जवळपास ४० हजार सदनिका विक्रीसाठी तयार होत्या. मात्र ग्राहक तिकडे फिरकतच नव्हते. परंतु आता या व्यवसायात बऱ्यापकी उलाढाल होत असून परवडणारी घरे खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे.

या ४० हजार घरांपकी ६० टक्के घरांची विक्री झाली आहे.  घरविक्रीचा हा वेग वाढण्यात प्रधानमंत्री आवास योजनेचा मोठा वाटा आहे. या योजनेनुसार, ग्राहकांना कर्जात सुमारे २ लाख ६० हजारांची सूट सहा महिन्यांत मिळते. सुमारे तीन वर्षांपूर्वी वस्तू व सेवा कर आणि नोटाबंदीमुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्राला मोठा फटका बसला होता.  आता नागपूरकरांनी घर खरेदीला सुरुवात केल्याने बांधकाम व्यावसायिकांनी नव्या निवासी संकुलांचे बांधकाम होती घेतले आहे. शहरात सद्यस्थितीत शंभरावर छोटय़ा-मोठय़ा निवासी संकुलांचे बांधकाम सुरू आहे.  यामधे निम्म्याहून अधिक परवडणारी घरे आहेत. सध्या २५ ते ५० लाखांच्या सदनिकांना विशेष मागणी आहे. दोन किंवा तीन खोल्यांच्या घरांची मागणी वाढत आहे.   व्याजदर कमी झाल्यास या क्षेत्राला पूर्वीप्रमाणे सुगीचे दिवस येण्याची शक्यता व्यावसायिकांनी वर्तवली आहे. दिघोरी, दाभा, बेलतरोडी, नरसाळा, घोगली या भागात मोठे निवासी संकुल बांधले जात आहेत. याचे दर २५ ते ६० लाखांच्या घरात असल्याने नागपूरकरांची खरेदीसाठी विचारणा सुरू असून पूर्व नोंदणीही सुरू झाल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. पुढील दोन महिन्यात या व्यवसायात अधिक तेजी येण्याची चिन्हे आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळत असल्याने नागपूरकर तयार सदनिका खेरदीला प्राधान्य देत आहेत. पूर्वीच्या तुलनेत बाजारात बऱ्यापकी खरेदी सुरू आहे. आर्थिक वर्ष संपताच बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. २५ ते ६० लाखांच्या आतील सदनिकेला अधिक मागणी आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी निवासी संकुले उभारणे सुरूकेले आहे.

– महेश साधवाणी, अध्यक्ष, नागपूर क्रेडाई.