नागपूर ः महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. भाजप त्यांच्या मित्र पक्षावरच डाव टाकत आहे. भाजपचा आजवरचा राजकीय इतिहास बघता त्यांनी आपल्या मित्र पक्षांना संपवले आहे. त्याच प्रमाणे आता शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची गती होणार असल्याचे सांगून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत आज नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना दिले.भविष्यात भाजप आणि कॉंग्रेस दोनच पक्ष शिल्लक राहतील, असेही पटोले म्हणाले.
अमरावतीच्या माजी खासदार नवनित राणा यांनी मध्यंतरी शिंदे व उध्वव ठाकरे आणि अजित दादांच्या पक्षाचे अनेक बडे नेते, आमदार व खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. या प्रश्नावर त्यांनी मित्र पक्षांना संपवणे हा भाजपचा इतिहासच असल्याचे सांगितले. भाजप हा इतरांना गिळंकृत करणार पक्ष आहे. देशभरातील भाजपच्या मित्र पक्षांचे काय झाले यावर नजर टाकल्यास शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फारकाही भवितव्य दिसत नाही. त्यांचे नेते भाजपमध्ये सामील झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. याची सुरुवात झाली आहे. असे झाल्यास राज्यात यापुढे भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष शिल्लक राहतील असेही पटोले म्हणाले.
भाजप हा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा गेम करणार असल्याचे मी आधीच बोलले होते. आणखी मोठा खेळ शिल्लक आहे. फक्त आठ दिवस थांबा हे तुम्हाला दिसेल. महाराष्ट्राची जनता भाजपच्या या खेळाला कंटाळली आहे. त्यांना पुन्हा सत्तेवर काँग्रेस हवी आहे. मात्र सरकारने बॅलेटवर मतदान घेतले तर जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देली असा दावाही पटोले यांनी केला.
खरात सत्ताधाऱ्यांना पोसलेला बाबा
भोंदू बाबा अशोक खरात हा सत्ताधाऱ्यांनीच पोसलेला बाबा आहे. राज्यातील अनेक बडे नेते त्याच्याकडे जायचे. व्हीआयपींची मुव्हमेंट त्याच्या आश्रमात सुरू असायची. यानंतर सरकाराला आणि विशेषतः गृहमंत्र्यांना याची काही खबरबात नव्हती हे खरे वाटत नाही. सरकारनेच आजवर त्याचा पाठिशी घातले होते. या प्रकरणामुळे आता सरकार अडचणीत आले असून आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोपही यावेळी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
