अनिल कांबळे, लोकसत्ता नागपूर: राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये लाचखोरीचे प्रमाण वाढले असून नाशिक परिक्षेत्र लाचखोरीमध्ये पहिल्या तर पुणे विभाग द्वितीय स्थानावर आहे. राज्यात लाचखोरीत महसूल विभाग पहिल्या स्थानावर तर पोलीस विभाग द्वितीय स्थानावर आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढत आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात लाच घेतल्याशिवाय काम होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते. लहानसहान शासकीय कामासाठी अधिकारी आणि कर्मचारी पैशांची मागणी करतात. काही त्रस्त नागरिक नाईलाजास्तव लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) तक्रारी करतात. यावर्षी १ जानेवारी ते ११ मे २०२३ यादरम्यान राज्यात ‘एसीबी’ने ३१३ लाचखोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली असून तब्बल ४४४ लाचखोर कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. राज्यात सर्वाधिक ६४ ठिकाणी सापळा कारवाई नाशिक परिक्षेत्रात झाली. पुणे विभागात ५५ आणि छत्रपती संभाजीनगरात ५१ ठिकाणी कारवाई करण्यात आली. ठाण्यात ४३ आणि नागपुरात केवळ २८ कारवायांची नोंद आहे. हेही वाचा. मातृदिनी मुलांच्या आठवणींचा गहिवर दाटून आला अन… हतबल मातेने उचलले आत्मघाती पाऊल महसूल विभाग आणि पोलीस विभागात लाचखोरीमध्ये नेहमी स्पर्धा दिसते. गतवर्षी पोलीस विभाग भ्रष्टाचारात पहिल्या स्थानावर तर महसूल विभाग दुसऱ्या स्थानावर होता. महसूल विभागात यावर्षी ७७ तर पोलीस विभागात ५४ सापळा कारवाई करण्यात आल्या. पंचायत समिती (३२), मराविमं (१८) आणि महापालिकांमध्ये १५ ठिकाणी कारवाई करण्यात आली. आकडे काय सांगतात? महिना - सापळे - आरोपी जानेवारी - ५९- ८० फेब्रुवारी - ७५ - १११ मार्च - ८८ - १२४ एप्रिल - ७० - १०० मे (११ पर्यंत) २१ - २९