२४ तासांत १४ नवीन करोनाग्रस्तांची भर

नागपूर : पुणे येथील अकादमीतून प्रशिक्षण घेऊन नागपुरात परतणाऱ्या करोनाग्रस्त पोलिसांची नोंद सोमवारी झाल्यामुळे शहरातील २४ तासांतील नवीन बाधितांमध्ये दोन आकडी म्हणजे १४ रुग्णांची भर पडली. तर सलग तिसऱ्या दिवशी ग्रामीणला एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर जिल्ह्य़ात दिवसभरात एकही मृत्यू नाही.

नागपूर ग्रामीणला १० सप्टेंबरला ४ रुग्ण आढळले होते. त्यानंतर सलग तीन दिवस एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. तर पुणे येथील अकादमीत प्रशिक्षण घेऊन नागपुरात परतलेल्या १३ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे रविवारी पुढे आले. या सगळ्यांना आमदार निवासात विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

या सर्व नोंदीसह एक आणखी नवीन रुग्ण आढळल्याने शहरात २४ तासांत १४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ४० हजार १५८, ग्रामीण १ लाख ४६ हजार १४८, जिल्ह्य़ाबाहेरील ६ हजार ८२५ अशी एकूण ४ लाख ९३ हजार १३४ रुग्णांवर पोहचली

आहे. तर दिवसभरात शहरात १ व्यक्ती करोनामुक्त झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३४ हजार १९८, ग्रामीण १ लाख ४३ हजार ५२६, जिल्ह्य़ाबाहेरील ५ हजार २०३ अशी एकूण ४ लाख ८२ हजार ९२५ व्यक्तींवर पोहचली आहे.

सक्रिय रुग्णसंख्या वाढती

मध्यंतरी जिल्ह्य़ातील सक्रिय रुग्णसंख्या पन्नासाहून खाली गेली होती. परंतु गेल्या काही दिवसांत पुन्हा अधून-मधून रुग्ण वाढल्याने शहरात सध्या ५६, ग्रामीणला १८, जिल्ह्य़ाबाहेरील २ अशा एकूण ७६ सक्रीय करोनाग्रस्त आहेत. पैकी ५७ जणांवर विविध रुग्णालये वा कोविड केअर सेंटरला उपचार सुरू आहेत, तर इतर १५ जणांना विलगीकरणात नेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ग्रामीणला केवळ २६२ चाचण्या शहरात दिवसभरात २ हजार ९७३, ग्रामीणला केवळ २६२ अशा एकूण ३ हजार २३५ संशयितांनी चाचणीसाठी नमुने दिले.

विदर्भातील निम्मे नवीन रुग्ण नागपुरातील

विदर्भात २४ तासांत एकही करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर २७ नवीन रुग्णांची भर पडली. येथील सहा जिल्ह्य़ांत एकही नवीन रुग्ण आढळला नसला तरी विदर्भातील निम्म्याहून अधिक रुग्ण एकटय़ा नागपुरात नोंदवले गेले. नागपुरात दिवसभरात १४, गडचिरोलीत ३, यवतमाळला १, वाशीमला ३, बुलढाण्यात ६ अशा एकूण २७ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, वर्धा या सहा जिल्ह्य़ांमध्ये मात्र एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला.