नागपूर: राज्य शासनासह महावितरण कंपनीकडून सातत्याने कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीज बिल वसुलीसाठी विविध मोहिम राबवली जाते. कामाचा ताण वाढत असल्याचे सांगत कामगार संघटना बिल वसूलीच्या कामात विविध कर्मचाऱ्यांना लावले जात असल्याने संतापही व्यक्त करते. दरम्यान महावितरणच्या लग्न झालेल्या कर्मचाऱ्याचा एक उखाणा सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात तो बायकोचे नाव घेत थेट नागरिकांना महावितरणचे वीज बिल भरण्याचे आवाहन करतो. या उखाण्याबाबत आपण जाणून घेऊ या.
राज्यातील मुंबईचा काही भाग वगळून सर्वत्र महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. महावितरणची थकबाकी वाढतच चालली असून कंपनी आर्थिक कोंडीत सापडली आहे. दरम्यान महावितरणकडून राज्यातील सर्व भागात वीज बिलाची थकबाकी वसुलीवर जोर दिला जात आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही वसूलीसाठी विविध जबाबदारी दिली जात आहे. दरम्यान तांत्रिक कर्मचाऱ्याकडे वीज बिल वसूलीची जबाबदारी दिल्यावर विविध कामगार संघटना आक्षेप घेत वेळोवेळी आंदोलनाद्वारे आक्षेपही नोंदवते. त्यातच नागपुरातील एका महावितरण कर्मचाऱ्याच्या समाजमाध्यमावर वायरल झालेल्या व्हिडिओने वीज बिल भरण्याबाबतची जनजागृतीही होत आहे.
सुबोध चहांदे यांचा हा व्हिडिओ आहे. सुबोध हा महावितरणच्या नागपूर शहरातील महाल विभागात यंत्रचालक म्हणून कार्यरत आहे. २७ एप्रिल २०२५ रोजी त्याचे अमरावती जिल्ह्यात श्रद्धा हिच्याशी लग्न झाले. दोघांच्या लग्नाचा समारंभ दुसऱ्या दिवशी २८ एप्रिल २०२५ रोजी नागपुरातील नरसाळा मेन रोड, दिघोरी येथील एका लाॅनवर झाला. लग्नानंतर त्याच्या घरातील विविध मनोरंजक कार्यक्रम सातत्याने होत आहे. त्यात एक उखाण्याचा कार्यक्रमाचाही समावेश होता.
— chaitanya sudame (@ChaitanyaSudame) May 5, 2025
दरम्यान उखाण्यात सुबोध याने बायकोचे नाव घेत ग्राहकांना वीज बिल भरण्याचे आवाहन करत महावितरणला सहकार्य करण्याचेही आवाहन केले. दरम्यान एकीकडे महावितरण कर्मचाऱ्याला अतिरिक्त जबाबदारी दिल्यावर विविध कामगार संघटनांकडून संताप व्यक्त होत असतांनाच दुसरीकडे महावितरणचा नवीन युवा कर्मचारी ग्राहकांना थेट वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे. त्याचे महावितरणच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून प्रशंसा केली जात आहे.
महावितरणवरील थकबाकी किती ? लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून झालेल्या ‘मोफत’च्या घोषणा, याच काळात वीज थकबाकी वसुलीकडे ‘महावितरण’चे झालेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे सर्व ग्राहकांच्या वीज बिलाची थकबाकी ९८ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. धक्कादायक म्हणजे यात एकट्या कृषीपंपांच्या बिलांची थकबाकी ७५ हजार कोटींहून अधिक आहे. थकबाकीचा आकडा फुगत चालला असून त्याने एक लाख कोटी रुपयांचा टप्पाही ओलांडला असल्याची सूत्रांची माहिती आहे.