केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या रोकठोक भूमिकेसाठी लोकप्रिय आहेत. आज त्यांच्या याच भूमिकेची प्रचिती नागपूरमधील एका कार्यक्रमामध्ये पुन्हा पहावयास मिळाली. आपल्याच पक्षातील नेत्यांना शाब्दिक चिमटे काढत नितीन गडकरींनी कामाच्या आधारेच आगामी नागपूर महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांना तिकीट दिलं जाईल असे स्पष्ट संकेत गडकरींनी दिलेत. नागपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक कधी होणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मात्र आपला गृह जिल्ह्यातील गड वाचवण्यासाठी कार्यरत झाले आहेत. विद्यमान नगरसेवकांना आगामी निवडणुकीत संधी देण्याचा गडकरींचा विचार दिसत नसल्याने अनेकांचे टेन्शन वाढले आहे. आज नागपूर महानगरपालिकेतर्फे नागपूर शहारातील वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गडकरी उपस्थित होते. मात्र त्यांनी या कार्यक्रमाच्या वेळी भाषणामधून मांडलेले मुद्दे नागपूरच्या राजकीय वर्तुळामध्ये सूचक संदेश देणारे ठरले. या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी रिपोर्टकार्ड नुसार विद्यामानांना संधी मिळणार आल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. "राजकारणात माझ्याशिवाय नवीन कुणीही येऊ नये हे कुणालाही वाटणे स्वाभाविक आहे. कोणत्याही नेत्यांचा कार्यकर्ता असो, ते तोंडावर कौतुक करतात, हवेत उडवतात मात्र जोपर्यंत जनता म्हणणार नाही तोपर्यंत उमेदवारी मिळणार नाही," असं गडकरींनी भाषणामध्ये स्पष्ट केले आहे. मनपा निवडणुकीत नगरसेवक पदासाठी एक अनार सौ बिमार अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले आहेत. "असं असलं तरी मी देवाला प्रार्थना करतो की तुम्हालाच पुन्हा नगरसेवकाची तिकीट मिळो," असं सांगून विद्यमानांची चिंता वाढवली आहे. आज महानगर पालिकेतील नगरसेवकांना सेंड-ऑफ देण्याचा दिवस आहे,त्यामुळे सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा देतो, पण माझ्या हातात तिकीट नाही. सर्व्हेनुसार जनता ज्याला तिकीट द्याययला सांगेल त्यांचा तिकीट मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. "महानगरपालिका चालवणे खूप कठीण काम आहे. जनतेला मंत्री, खासदार, आमदारांपेक्षा नगरसेवकांकडूनच सर्वात जास्त अपेक्षा असतात. उठता बसता नगरसेवक आपल्या घरासमोर हजर रहावा अशीच इच्छा जनतेची असते. जणू नगरसेवक म्हणजे हजार रुपये महिन्याचा घरगडीचं आहे," असं गडकरींनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. विपरीत परिस्थितीत सुद्धा नागपूर महानगरपालिका खूप चांगलं काम करत आहे, असं म्हणत गडकरींनी महापौर आणि मनपा आयुक्तांच्या कामाचे कौतुक केलं.