चंद्रपूर : तृतीयपंथींयाना समाजात सन्मानाची व समान वागणूक मिळावी यासाठी संबोधन ट्रस्ट संस्थेच्या वतीने चंद्रपूर शहरात ‘प्राईड’ रॅली काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तृतीयपंथींयांनी हातात ‘मला गर्व आहे मी तृतीयपंथीय असल्याचा’, ‘प्रेम हे प्रेम असतं’ असे फलक घेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
तृतीयपंथींयाना समाजात योग्य वागणूक दिली जात नाही. त्यांना समाजाकडून वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला जातो. तृतीयपंथीयांनासुध्दा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांनासुध्दा प्रेम करण्याचा विवाह करण्याचा अधिकार आहे. समाजाचा तृतीयपंथीयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा, त्यांना सन्मानाची योग्य वागणूक मिळावी यासाठी संबोधन ट्रस्टचे राज काचोडे यांनी शहरातील किन्नर, गे यांना सोबत घेत ‘प्राईड’ रॅली काढली. शनिवारी १७ फेब्रुवारी २०२४ ला शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. किन्नर, गे यांनी हातात फलक घेवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात प्रयत्न केला आहे. तृतीयपंथींनी हातात घेतलेल्या ‘मला गर्व आहे मी तृतीयपंथीय असल्याचा’ , ‘प्रेम हे प्रेम असतं’ या फलकांनी चंद्रपूर शहरातील नागरिकांचे लक्षे वेधून घेतले हाेते. चंद्रपूर पोलिस दलात एका तृतीयपंथीला नोकरी मिळाली असून शासन तृतीयपंथीबाबत समान धोरण व सन्मानाची वागणूकीबाबत कटीबध्द आहे. त्यामुळे येत्या काळात तृतीयपंथी नोकरी, व्यवसायाकडे वळतील. समाजाचा तृतीयपंथींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असून येणाऱ्या काळात त्यांना नागरिकांकडून सन्मानाची वागणूक मिळेल असे अशी आशा राज काचोळे यांनी लोकसत्ताशी बोलतांना व्यक्त केली.
हेही वाचा >>>दुचाकीचा धक्का लागल्याचे कारण झाले अन् भररस्त्यात तरुणाला संपवले
संबोधन ट्रस्टचे संचालक राज काचोळे हे दरवर्षी फेब्रुवारी महिण्यांमध्ये चंद्रपूर शहरातील तृतीयपंथींयाना एकत्र घेत जनजागृतीपर रॅली काढली जाते. या रॅलीचा मुख्य उद्देश हा नागरिकांमध्ये तृतीयपंथीबद्दल जनजागृती होवून त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी ते मागील अनेक वर्षांपासून प्रयत्नरत आहेत. तसेच तृतीयपंथीयासाठी आरोग्य शिबीर, जनजागृतीपर मार्गदर्शन शिबीर यासह विविध कार्यक्रम ते तृतीयपंथीसाठी आयोजित करीत असतात.