वरंब्या गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्यावर सीटी १ वाघाने हल्ला करून त्याचा बळी घेतला. आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील उसेगाव परिक्षेत्रात ही घटना घडली.प्रेमपाल तुकाराम प्रधान (४५, रा. उसेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, काल ज्या वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष पथक या परिसरात दाखल झाले, त्याच नरभक्षी सीटी १ वाघाने हा हल्ला केल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> अमरावती : अखेर ‘ती’ बेपत्‍ता तरुणी साताऱ्यात सापडली; ‘लव्‍ह जिहाद’ साठी अपहरण झाल्याचा आरोप

देसाईगंज व आरमोरी तालुक्यात सध्या सीटी १ वाघाची प्रचंड दहशत आहे. त्यामुळे वनविभागाकडून परिसरातील नागरिकांना जंगलात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, प्रेमपाल आपल्या साथीदारासह आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास जंगलात वरंब्या गोळा करण्यासाठी गेले होते. दरम्यान, जवळच दबा धरून बसलेल्या सीटी १ वाघाने प्रेमपालवर हल्ला करून त्याचा बळी घेतला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या साथीदाराने धटनास्थळावरून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबातून आलेल्या विशेष पथकाला त्याचा शोध घेण्यात अद्याप यश आलेले नाही.