लोकसत्ता टीम बुलढाणा: मागील चार दिवसांपासून एकजूट व निर्धाराने संपावर ठाम असलेल्या राज्य समन्वय समितीने आता माघार नाहीच असा निर्धार केला आहे. लाखो कर्मचाऱ्यांतील जोश व जिद्द कायम राखण्यासाठी समितीने पुढील टप्प्यातील आंदोलनाची आज शुक्रवारी घोषणा केली आहे. सरकार तडजोड करायला तयार नाही आणि १८ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना मागे हटायला तयार नाही. मागील चार दिवसांत कर्मचाऱ्यांनी वाहन रॅली, धरणे ,निषेध मोर्चे, शासन निर्णय होळी आदी आंदोलने केली. या पार्श्वभूमीवर संपाच्या चौथ्या दिवशी संध्याकाळी राज्य समितीने विविध टप्प्यातील आंदोलने जाहीर केली आहे. येत्या २० मार्च रोजी राज्यभरातील कार्यालये व शाळांसमोर थाळीनाद करण्यात येणार आहे. एकाचवेळी दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान हे आंदोलन करण्यात येईल. आणखी वाचा- बुलढाणा: अन्नदात्याचे अन्नत्याग आंदोलन, तीन गावातील शेतकरी पीकविम्यासाठी जिल्हा कचेरीसमोर २३ मार्चला 'काळा दिवस' पाळण्यात येणार आहे. यादिवशी सर्व कर्मचारी हाती काळे झेंडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयांवर आक्रोश मोर्चा काढणार आहे. २४ मार्चला माझे कुटुंब माझी पेंशन अभियान राबविण्यात येणार आहे. संपकरी कर्मचारी आपल्या परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून शासनाचा निषेध करणार आहे.राज्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी या आंदोलनाची घोषणा केली.