पोलिसांनी केला अपघात झाल्याचा दावा नागपूर : नागपूर शहर पोलीस दलातील एका हवालदाराने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रात्री नऊ वाजता बेलतरोडीत उघडकीस आली. प्रमोद चिंतामन राऊत (५५) असे मृत हवालदाराचे नाव आहे. मात्र, त्या हवालदाराचा मृत्यू रेल्वे अपघातात झाल्याचा दावा बेलतरोडी पोलिसांनी केला आहे. हेही वाचा >>> नववर्षाच्या पहिल्याच दिवशी युवकाला चाकू, तलवारीने भोसकले हेही वाचा >>> ‘तिने बोलणे बंद केले, तर त्याने थेट चाकूने वार केले’; माजी सरपंचाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद राऊत हे बेलतरोडी पोलीस ठाण्यात होते. ते पत्नी व दोन मुलांसह महालक्ष्मीनगर, मानेवाडा रोड येथे राहतात. गेल्या काही दिवसांपासून ते ड्युटीमुळे तणावात होते. रविवारी त्यांची साप्ताहिक सुटी होती. ते सायंकाळी दुचाकी घेऊन घराबाहेर पडले. मनिषनगर रेल्वे लाईनसमोर त्यांनी दुचाकी उभी केली आणि धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. प्रमोद राऊत हे रस्ता ओलांडत असताना त्यांना रेल्वेने धडक दिल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा दावा बेलतरोडी करीत आहेत. वरिष्ठांच्या दबावात पोलीस हवालदराच्या आत्महत्येच्या प्रकरणाला अपघाताचे स्वरुप दिल्या जात असल्यामुळे पोलीस विभागात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.