लोकसत्ता टीम

नागपूर : दीक्षाभूमी एकात्मिक विकास प्रकल्पाअंतर्गंत भूमिगत वाहनतळाला नागपुरातील आंबेडकरी अनुयायांचा विरोध झाल्याने अखेर नागपूर सुधार व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या बैठकीत वाहनतळासाठीचे खड्डे बुजवण्याचा निर्णय घेण्यात आला.

१ जुलैलाआंदोलन करण्यात आले होते. बांधकाम बंद पाडले तसेच जाळपोळ करण्यात आली. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य सरकारने प्रकल्पाच्या कामाला स्थगितीची घोषणा केली. आता भूमिगत वाहनतळ बांधण्यात येणार नाही. बांधकामासाठी केलेले खड्डे बुजवण्यात येतील. तसेच संपूर्ण मैदान समतल केला जाईल. धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी हे काम करण्याची जबाबदारी नासुप्रची राहणार आहे. याशिवाय दीक्षाभूमी विकास आराखडा नव्याने तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आणखी वाचा-रणथंबोरच्या “रिद्धी” वाघीण आणि बछड्यांची कमाल पहिलीत का !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ एप्रिल १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्या ठिकाणी आज पवित्र दीक्षाभूमी आहे. देश-विदेशातील लाखो अनुयायी दरवर्षी विजयादशमीला येथे येतात. त्यामुळे दिक्षाभूमीचा विकास करण्याची योजना आखण्यात आली. सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून पवित्र दीक्षाभूमीचा एकात्मिक विकास प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यानुसार भूमिगत वाहनतळाचे काम सुरू झाले आहे. हे वाहनतळ पवित्र दिक्षामूमीला धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भूमिगत वाहनतळ बांधण्यात येऊ नये, अशी मागणी आंबेडकरी अनुयायांची आहे. त्यासाठी ते आज दिक्षामीवर दुपारी दोनच्या एकत्र आले आणि वाहनतळाचे काम बंद पाडले. तसेच तेथील ‘सेंट्रींग’च्या लाकडी पाट्या जाळून टाकले. बांधकामाच्या सळई वाकवण्यात आल्या. हे आंदोलन सुमारे दीड तास सुरू होते. त्यानंतर विधानसभेत सरकारकडून या कामाला स्थिगती देत असल्याचे जाहीर केले. पोलिसांनी आंदोलकांची मागणी मान्य झाल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलक शांत झाले. आंदोलक स्मारक समितीच्या विरोधात ‘ स्मारक समिती हटाव दीक्षाभूमी बचाव’ अशा घोषणा देत होते.

दीक्षाभूमीच्या विकासासाठी प्रथम टप्प्यात राज्य शासनाने सुरुवातील शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. दीक्षाभूमीच्या विकासासाठी नागपूर सुधार प्रन्यास बांधकाम करीत आहे. नासुप्रच्यावतीने दीक्षाभूमी विकासासाठी सुधारित २०० कोटींचा आराखडा तयार केला. पहिल्या टप्प्यात ४० कोटींच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यापैकी सुमारे २५ कोटीचे कामे झाली आहेत. आता भूमिगत वाहनतळ रद्द करण्यात आल्याने सुमारे २५ कोटी रुपये पाण्यात जाणार असल्याचे नासुप्रच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-आर्वी कुणाची? उमेदवारी व पक्षीय पातळीवर…

डॉ. बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धम्मघोषणेनंतर पावन झालेली, बौद्धांचे प्रेरणास्थान ऐतिहासिक दिक्षाभूमी आहे. दीक्षाभूमीवर सौंदर्यीकरणच्या नावाखाली तोडफोड सुरू आहे, असा आरोप असून या संपूर्ण बाबींचा विचार करून संविधानिक मार्गाने न्याय लढा देण्यासाठी दिक्षाभूमी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. याच समितीच्या नेतृत्वाखाली हजारो आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर एकत्र आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांपासून दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या बांधकामावर आक्षेप घेतल्या जात आहे. स्मारक समितीने वतीने आक्षेपकर्त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न देखील केला. बांधकाम व सौंदर्यीकरण तांत्रिकदृष्ट्या किती मजबूत व फायद्याचे आहे हेही पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु आंबेडकरी अनुयायींचे समाधान झाले नाही.