वर्धा : नटून थटून आलेके विद्यार्थी, सज्ज पोलीस व गृहरक्षकदल, सुटबुटातील मान्यवर, करकरीत जोधपूरीत पालकमंत्री. पण सर्व थिजले. कारण बत्ती गुल. प्रजासत्ताक दिन ऐन भरात आला आणि लाईन गेली म्हणून साऊंड सिस्टीम बंद. केव्हा येणार म्हणून सर्व प्रतीक्षेत. पण येता येईना. १० मिनिटांनी साऊंड सूरू. पण उत्साह मावळलेला.

पोलीस मुख्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते संपन्न झाले. नंतर विविध पाथकांचे संचालन झाले. विकसित महाराष्ट्र संकल्प पूर्ण करण्यासाठी वर्धा जिल्ह्याचे योगदान अधिक असेल व हे लक्ष्य गाठण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करू, असे आवाहन होत नाही तीच विद्युत पुरवठा ठप्प पडला. ही चूक कोणाची अशी विचारणा केल्यावर जिल्हा प्रशासनातील अधिकारी म्हणाले की साऊंड सिस्टीम व मैदान ही जबाबदारी वर्धा पालिका प्रशासनाची असते. त्यांचा भोंगळ कारभार भोवला. कार्यक्रमाची शोभा गेली. गांभीर्याचा अभाव दिसून आला.

तर वर्धा पालिका मुख्याधिकारी विजय देशमुख हे याविषयी अधिकृत बोलतांना म्हणाले की पालिका यास जबाबदार कशी राहणार.माझ्याकडे पाणी पुरवठा व साऊंड सिस्टीम या दोनच जबाबदाऱ्या होत्या. लाइन गेली त्यास मी जबाबदार कसा ? ते काम विद्युत विभागाचे. काहीही सांगून टाकायचे, अशी नाराजी देशमुख व्यक्त करून टाकतात. पण पालिका प्रशासन हेच आजच्या दिवशी व्यवस्था बघत असते. अन्य जबाबदाऱ्या विविध यंत्रणा सांभाळून घेते, असा सूर उमाटला. घामाघूम झालेले पालकमंत्री व अन्य मान्यवार लाईन येण्याच्या प्रतीक्षेत असतांना शेवटी सिस्टीमला सूर आला.

निवासी उपजिल्हाधिकारी जाधवर म्हणतात झाले ते चूकच. पण फार वेळ साऊंडचा खोलंबा नव्हता. आता एकमेकांवर जबाबदारी टाकल्या जात असेल तर योग्य नव्हे. एमएसईबी यंत्रणेस खबरदार करण्यात आले होते जनरेटर पण होते. पण कोण बेजबाबदार वागले हे सांगता येणार नाही. पण या प्रकरणात चौकशी केल्या जाईल. तर विद्युत विभाग अधिकारी म्हणतात आम्ही तयारी पूर्ण ठेवली होती. साऊंड सिस्टीम मध्येच फॉल्ट होता. त्यास आम्ही काय करणार.

तर जिल्हाधिकारी वान्मथी सी मॅडम म्हणतात की क्षम्य नाहीच. मोठी चूक झाली. आजच मी शो कॉज नोटीस काढणार. मेमो पण देणार, अशी रोखठोक भूमिका जिल्हाधिकारी मॅडम यांनी लोकसत्ताच्या विचारनेवर स्पष्ट केली आहे. एकूणच प्रजासत्ताक दिन सहज घेण्याची बाब गंभीर होण्याची स्थिती आहे.