भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर २४ ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली होती. २४ ऑगस्टला तारखेला उशिरा रात्री त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, नारायण राणे यांच्या अटकेच्या कारवाईनंतर देशातील राजकीय वातावरण चांगलचं पेटलं आहे. या वादावार विश्व हिंदू परीषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भाष्य केले आहे. त्यांचे आज नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे आणि राणे वादावर भाष्य करताना तोगडिया म्हणाले की, “हा वाद भविष्यात मिटेल आणि हे दोघेही एका ताटात जेवतील. हे राजकारण आहे. यात सर्व चालतं आज भाजपा-शिवसेना जरी विरोधात असले तरी ते उद्या एका ताटात जेवतील, यांचं हे सुरुच राहील. हे कधी भांडतील तर कधी एकमेकांच्या गळ्यात पडतील.”

…तर मी शिवसेना जिंदाबाद म्हणेन

“देशाच्या हितात जे काम करतील त्यांच्या बाजूने आम्ही राहू. भाजपाने देशाच्या हितात काम केले तर आम्ही भाजपा जिंदाबाद म्हणू, शिवसेनेने काम कले तर शिवसेना जिंदाबाद म्हणू तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा देखील जय म्हणू. आम्ही आता कोणत्या दलाचे गुलाम नाही आहोत. जे देश हिताचे काम करतली त्यांच्या बाजूने आम्ही असू,” असे देखील प्रवीण तोगडिया म्हणाले.

प्रवीण तोगडिया यांनी सध्याच्या स्थितीत भारताला तालिबानकडून मोठा धोका असल्याचे मत देखील व्यक्त केले. भारतात तालिबानी विचारधारेचे केंद्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच जे शरणार्थी भारत अफगाणिस्थान मधून आणत आहेत त्यांचीच पिढी भविष्यात आपल्या पोलिसांना मारतील याचे उदाहरण फ्रान्स मध्ये पहावयास मिळाले आहे असेही ते बोलले.