वर्धा : प्रवाश्यांच्या रेटयामुळे दबावात असलेल्या खासदार रामदास तडस यांनी अखेर राजिनाम्याचे अस्त्र उगारताच रेल्वेमंत्र्यांनी पाच गाड्यांचे थांबे मंजूर केले असून एकाच वेळी एवढे थांबे करोनापश्चात मंजूर होण्याची ही पहिलीच बाब समजल्या जाते. कोविड महामारीमुळे देशभरातील रेल्वे सेवा मोठया प्रमाणात प्रभावित होती. त्याचा फटका अनेकांना बसला. वर्धा लोकसभा क्षेत्रातील व्यापारी, विद्यार्थी तसेच चाकरमानी वर्ग मोठया प्रमाणात नागपूर व अन्य महानगरात जाण्यासाठी रेल्वेवर अवलंबून असतो. गाड्या बंद झाल्याने या वर्गास अडचणी येत होत्या. काही स्थानकांवर गाड्या सुरू होण्यासाठी आंदोलनाचे ईशारे देण्यात आले होते. अनेकांनी खा. तडस यांची भेट घेवून रोष व्यक्त केला. त्याची दखल घेत खासदारानी लोकसभेत प्रश्न उपस्थित केले. रेल्वेमंत्री तसेच अधिकाऱ्यांकडे पाठपूरावा केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने खा.तडस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून थांबे देण्याची विनंती करीत राजिनामा देण्याची तयारी दर्शविली. या भेटीत सुध्दा विविध अडचणी सांगण्यात आल्या. कोळसा व विजेचा तुटवडा संपुष्टात आल्यावरच थांबे सुरू होण्याची शक्यता मांडण्यात आली. मात्र राजिनाम्याचा विचार सोडा, थांबे देण्याबाबत अग्रक्रमाने विचार करू असे आश्वासन मिळाले. या विषयी आज पत्रकार परिषदेत खा. तडस यांनी माहिती दिली. देशभरात दहा हजारावर थांबे बंद असून पहिल्या टप्प्यात वर्धा लोकसभा क्षेत्रातच एकाच वेळी पाच थांब्यांना मंजूरी मिळाली आहे. हिंगणघाट स्थानकावर नवजीवन व दक्षिण एक्सप्रेस, पुलगाव येथे नवजीवन व सुपरफास्ट मेल, सिंदीला दक्षिण व सेवाग्राम एक्सप्रेस, चांदूर रेल्वे येथे सेवाग्राम व अहमदाबाद हावडा एक्सप्रेस तसेच तुळजापूरला महाराष्ट्र एक्सप्रेस या गाडया पुर्ववत थांबणार आहे.हे थांबे २९ मे पासून सुरू होत आहे.या पुढे इंटरसिटी, भूसावळ व बल्लाशाह पॅसेंजर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा.तडस म्हणाले. वर्धा मतदारसंघात अ,ब,व क श्रेणीचे सर्वाधिक थांबे असल्याचे रेल्वेमंत्रालयाच्या निर्दशनात आणले होते. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कामात सहकार्य दिल्याचे खा.तडस यांनी नमूद केले.