प्रवाशांच्या सूचना; सर्वच रेल्वेगाडय़ांमध्ये भोजनव्यवस्थेची मागणी

रेल्वेत आमूलाग्र बदल घडवून सुखकर प्रवास करण्याची आशा रेल्वेचा कारभार स्वीकारताना दाखणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात काटकसरीवर भर देण्यात आला होता. पुढील महिन्यात त्यांचा दुसरा अर्थसंकल्प येत असून नवीन रेल्वे, नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज करणे आणि नवीन गाडय़ा सुरू करून प्रतीक्षा यादीवर नियंत्रण आणण्यासाठी पावले टाकणे अपेक्षित आहे. आगामी रेल्वे अर्थसंकल्पासाठी जनतेकडून प्राप्त झालेल्या सूचनांमधून या प्राथमिक गरजांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. याशिवाय नागपूरकरांनी रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाडय़ांमधील जेवणाची सुविधा आणि स्वच्छता यावर प्रामुख्याने भर दिला आहे.

नागपूर आणि गोंदियाहून सुटणाऱ्या एकाही गाडीमध्ये जेवणाची सुविधा ‘पेन्ट्री कार’ नाही. यामुळे जेवण करून गाडीत चढावे लागते किंवा जेवणाचा डबा घेऊन प्रवास करावा लागतो. ज्यांना या दोन्ही गोष्टी शक्य होत नाही आणि त्यांना उपाशी प्रवास करावा लागतो  किंवा स्थानकावर जे मिळेल ते खावे  लागते. यामुळे रेल्वेने नागपुरातून निघणाऱ्या काही गाडय़ांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘पेन्ट्री कार’ची सुविधा सुरू करावी, तसेच त्यासंदर्भात पाहणी करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

विदर्भ एक्सप्रेस नागपुरातून सायंकाळी ५ वाजता निघते. बहुतेकांच्या जेवणाच्या वेळा रात्री ७ ते ९ दरम्यान असतात. यामुळे या गाडीला पेंट्रीची मागणी होती. त्याला रेल्वेने बगल देत ‘ई-कॅटरिंग’ सुरू केले आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरून चढणाऱ्या प्रवाशांकडून वर्धा येथील खासगी उपाहागृह चालकाचा एक माणूस ऑर्डर घेतो आणि बडनेरापर्यंत प्रवाशांना जेवण्याचे पॉकेट दिले जाते. यामध्ये फार काही निवडीची संधी प्रवाशांना नाही. महाराष्ट्र एक्सप्रेसमधील प्रवाशांचे जेवणाच्याबाबतीत हाल आहेत. ही गाडी नागपुरातून सकाळी १०.५५ ला निघते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.४० वाजता पुण्याला पोहोचते.  या गाडीत ‘ई-कॅटरिंग’ मार्फत जेवणदेखील उपलब्ध केले जात नाही. यामुळे  या गाडीतून प्रवास करणे म्हणजे दोन दिवसांचे जेवण  सोबत घेण्याशिवाय पर्याय नाही. गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसप्रमाणे नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस, कोल्हापूर-गया दीक्षाभूमी एक्सप्रेस आणि नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस, नागपूर-जयपूर एक्सप्रेसमध्ये ‘पेन्ट्री कार’ सुविधा नाही आणि ई-कॅटरिंग योजनेच्या माध्यमातून खासगी उपाहारगृह चालकांकडून देखील जेवण्याची सोय करण्यात आलेली नाही. ‘ई-कॅटरिंग’ योजनेनुसार धावत्या गाडीतून पुढील स्थानकावर जेवणाचे ऑर्डर घेण्यात येतात. ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकावर उपाहार गृह चालवणाऱ्यांचे कर्मचारी गाडीतच प्रवाशांकडून जेवणाचे ऑर्डर मिळवतात आणि पुढील स्थानकावर ते जेवणाचे पॉकेट वितरित केले जातात. ही सुविधा केवळ विदर्भ एक्सप्रेसमध्ये आहे. वर्धा येथील उपाहार गृह चालकाला जेवण्याचे ऑर्डर घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

रेल्वे अर्थसंकल्पाच्या आधीच अनेकदा तिकीट दर वाढवण्यात आले. परंतु दुर्घटनेच्या वेळी प्रवाशांना दिली जाणारी नुकसान भरपाई वाढवण्यात आलेली नाही. त्यात वाढ करण्यात यावी तसेच दुर्घटनाग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेत नोकरी मिळावी. रेल्वे स्थानक, गाडय़ा आणि स्वच्छतागृहांची स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अस्वच्छ प्रसाधनगृहांमुळे रोगाचा फैलाव होण्याची शक्यता आहे, असेही रेल्वे यात्री केंद्राने म्हटले आहे.

  • रेल्वे भाडेवाढ, पण दुर्घनाग्रस्तांच्या मदतीत वाढ नाही.
  • तिकीट आरक्षण केंद्रातील संगणक बदलण्यात यावे.
  • जुन्या संगणकामुळे आरक्षण तिकीट मिळण्यास विलंब.
  • नागपूर स्थानक उच्च श्रेणीचे असूनही अतिरिक्त डब्यांची सुविधा नाही.