नागपूर : महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेची (एमएचटी-सीईटी) नोंदणी प्रक्रिया ११ मे रोजी संपली असून राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ६ लाख ४ हजार ८७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या नोंदणीत एक लाखाने वाढ झाल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेश वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘एमएचटी-सीईटी’ नोंदणीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांना सुदिन येण्याची आशा आहे. यावर्षी झालेल्या नोंदणीत मुंबई, पुणे आणि नागपूर जिल्ह्यातील नोंदणीचा वाटा सर्वाधिक आहे. तज्ज्ञांच्या मते, करोना महासाथीनंतर शैक्षणिक क्षेत्रातील परिस्थिती पुन्हा एकदा सुधारत आहे. त्यामुळे प्रवेशामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषत: शेजारच्या राज्यांतील विद्यार्थ्यांची नोंदणी यंदा वाढली आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था बिकट आहे. अनेक महाविद्यालयांना रिक्त जागांचा फटका सहन करावा लागत आहे. यामुळे काही महाविद्यालये बंद झाली आहेत. चार वर्षांतील नोंदणी.. गेल्यावर्षी या परीक्षेसाठी ५ लाख १७ हजार १३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २०२० मध्ये राज्यात एकूण ५ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २०१९ मध्ये ४ लाख १३ हजार २८४ आणि २०१८ मध्ये ४ लाख ३५ हजार ६०६ विद्यार्थ्यांनी ‘एमएचटी-सीईटी’साठी नोंदणी केली होती.