सरकारच्या निर्णयाचा परिणाम शून्य नागपूर : सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या मागणीत वाढ झाली आहे. अशात आता सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात पाच टक्के कपात केली आहे. तरी बाजारात त्याचा कोणताच परिणाम दिसून आला नाही. ठोक विक्रेत्यांकडे अजूनही शेंगदाणा आणि सूर्यफूल तेल १७० रुपये किलो याच दराने विकले जात आहे. गणराय आगमनाच्या निमित्ताने बाजारात खाद्यतेलाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. दहा दिवासांच्या काळात अनेक ठिकाणी महाप्रसाद आणि घरोघरी जेवणावळीमुळे खाद्यतेलाची खरेदी वाढली आहे. परंतु, तेलाचे दर जास्त असल्याने सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात पाच टक्क्याने कपात केली आहे. मात्र त्याचा कोणताही सकारात्मक परिणाम बाजारात दिसून येत नाही. आजही ठोक बाजारात सर्वाधिक खपणारे शेंगदाणा आणि सूर्यफूल तेल १७० रुपयेच आहे. पाम तेलाच्या किंमतीही तेवढय़ाच आहेत. पाम तेलाचे १५ किलोंचे टिन दोन हजार १०० ते दोन हजार २०० च्या दरम्यान विकले जात आहे. आयात शुल्क कमी झाल्यानंतर त्याचा परिणाम किंमतीवर होणे स्वाभाविक होते. परंतु किंमत कमी न झाल्यामुळे सणासुदीच्या काळातही नागरिकांना खाद्यतेल अधिक भावाने खरेदी करावे लागत आहे. मोहरीचे तेल शंभर रुपये प्रतिटन महागल्याने ते दोनशे रुपयांवर पोहचले आहे. शेंगदाना तेलाचे टिन २ हजार ४०० ते २ हजार ५०० च्या दरम्यान पोहचले आहे. सध्या ठोक भावात सोयाबीन तेल १५५ रुपये किलो, शेंगदाना आणि सूर्यफूल १७० रुपये, मोहरी तेल २०० रुपये, तीळ तेल २०० रुपये किलो विकले जात आहे. विशेष म्हणजे, किरकोळ बाजारात कंपन्यांचे पाकीटबंद तेलाचे भाव दोनशे ते अडीशे रुपये पार गेले आहेत.