राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर आज प्रथमच त्यांचे जिल्ह्यात आगमन होत आहे. आमचे काम कसे झक्कास चालले आहे, आम्ही कामात किती तत्पर आहोत, हे दाखविण्यासाठी पालकमंत्री ज्या मार्गाने जाणार आहेत त्या मार्गावरील खड्डे रात्रभर जागून नगर पालिकेने बुजवले आहेत. एका रात्रीत सिमेंटची भर टाकून रस्ता चकाचक केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नागपूर : विदर्भाचे आंदोलन संसदेपर्यंत घेऊन जाणार – डॉ. श्रीनिवास खांदेवाले

आज, ३ ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. याआधी सकाळी ९.४५ वाजता महाविद्यालय मार्गावरील लक्ष्मी सभागृहात जे. एम. पटेल कामगार परिषदेला ते संबोधित करतील. पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस प्रथमच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. निवडणूक काळात त्यांच्या दमदार सभा आणि प्रचाराने जिल्ह्यात भाजपला घवघावित यश मिळाले होते. जिल्ह्यातील समस्यांची पुरेपूर जाणीव फडणवीस यांना आहे. कोट्यवधीच्या जलपूर्ती योजनेचे रखडलेले काम, मागील दहा वर्षांपासून थंडबस्त्यात असलेला महत्त्वाकांक्षी भेल प्रकल्प, वैनगंगेच्या दूषित बॅक वॉटरच्या पाण्याचा प्रश्न, अस्वच्छता आणि खड्डेमय रस्त्यांच्या समस्या, अशा अनेक समस्यांची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या आगमनाने सर्व समस्या मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- नागपूर : ‘जाहिरातीमधून महिलांचे विक्षिप्त रुप दाखविणाऱ्यांना विरोध करा’

पालकमंत्री येणार म्हणून नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात ते जल शुद्धीकरण केंद्रापर्यंतचा खड्डेमय रस्ता अगदी एका रात्रीत सिमेंटने भरून वरवर मलमपट्टी करण्यात आली. जणू काही येथे खड्डे नव्हतेच असे दर्शविण्यात आले आहे. नगर पालिकेने हिच तत्परता प्रत्येक वेळी दाखवावी, अशी मागणी आणि चर्चा परिसरात आहे.

पालकमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात आगमन होणार असल्याने खासदार सुनील मेंढे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर जिल्ह्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. मात्र पालकमंत्री हे भाजप नेते म्हणून प्रचारकरिता येत आहेत की जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून येत आहेत असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी या फेसबुक पोस्टवरून भाजपला ट्रोल केले आहे.

हेही वाचा- यवतमाळ : देशाची वाटचाल विनाशाकडे; अर्थतज्ज्ञ प्रा. देसरडा यांची टीका

पालक मंत्र्यांनी रस्त्यावरून पायी जावे –

शहरात अनेक ठिकाणी जीवघेणे रस्ते असून आजवर या रस्त्यामुळे अनेकांचा नाहक बळी गेला आहे. दोन दिवसांपूर्वी आम्ही खासदारांच्या कार्यालयासमोरील खड्डे स्वतः बुजविले. रस्त्यांची कायमस्वरुपी दुरुस्ती करण्याची मागणी नगर पालिका आणि प्रशासनाला वारंवार करूनही दखल घेतली जात नाही. आज पालकमंत्री जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देणार म्हणून एका रात्रीत नगर पालिकेने खड्डे बुजविण्याची जी तत्परता दाखविली ती सदैव दाखवायला हवी. मुळात पालकमंत्र्यांना या रस्त्यावरून पायी चालत नेल्यास परिस्थितीचे गंभीर्य कळेल, असे मत हिला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष जयश्री बोरकर यांनी व्यक्त केले

जिल्हा सामान्य रुग्णालय मार्ग हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर कायमच अपघात होत असतात. मात्र मंत्री येणार असेल की रस्ते चकाचक होतात. रस्त्यांसाठी आम्ही अनेक आंदोलन केलेत मात्र अद्यापही नगर पालिका प्रशासनाने दखल घेतलेली नाही, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रमोद केसलकर यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Repair of roads by municipal corporation before guardian minister devendra fadnavis visits bhandara nagpur dpj
First published on: 03-10-2022 at 10:12 IST