ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे संकेत नागपूर : शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी बघता सौर कृषी पंपाच्या अटी- शर्थी शिथिल करण्याबाबत पुर्नविचार करण्याचे संकेत ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. डॉ. नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाभरातील पंचनामे, पीक विमा नुकसान तसेच वीज कंपन्यांकडून झालेले सर्वेक्षण याबाबतचा आढावा घेतला. नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात दौरा करताना सौर पंप संदर्भातील अटीशर्तीमुळे काही ठिकाणी पाण्याचा उपसा करताना शेतकऱ्यांना अडचण जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे वीज पंपाच्या क्षमतेसंदर्भात या भागातील अटी- शर्ती शिथिल करता येतील का, या संदर्भात अधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मििलद शेंडे, विद्युत कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. पीकहानीचे पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा गारपीटग्रस्त भागातील पीक हानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना लवकरच मदत केली जाईल, असा दावा डॉ. नितीन राऊत यांनी आज गारपीटग्रस्त भागाची पाहणी करताना केला. नागपूर ग्रामीणमधील बैलवाडा, गुमथळा, गुमथी तर रामटेक तालुक्यातील दाहोदा, जमुनिया, घोटी, आणि पारशिवनी तालुक्यातील करंभाड, इटगाव आणि लोणखैरी या गावांना राऊत यांनी भेट दिली. संत्रा, वांगे, काजूची झाडे, कापूस, तूर, गहू, उन्हाळी सोयाबीनचे नुकसान झाले असून, भाजीपाला पिकांमध्ये फुलकोबी, पानकोबी, मेथी, टमाटे, वाल, चवळी, पालक, कांदा, हरभरा आदी पिकांची मोठी नासाडी झाली आहे. कृषी व महसूल विभागाकडून पंचनामे सुरु आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होताच बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.