सौर कुंपण योजनेच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्याचे आदेश

नागपूर : वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतपिकाचे नुकसान टाळण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत अशा घटना ज्या ठिकाणी अधिक प्रमाणात घडतात, अशा संवेदनशील गावांमध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक सौर कुंपणाचा लाभ देणाऱ्या योजनेच्या मार्गदर्शक सूचना लवकरात लवकर जारी कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिल्या. यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त निधीच्या प्रस्तावासही त्यांनी मंजुरी दिली. 

चंद्रपूर जिल्ह्यतील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. वर्षां येथील समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी,  प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये उपस्थित होते. प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) जी. साईप्रकाश, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एन. प्रवीण, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने हे दूरदृश्य प्रणालीद्वारे  उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यत वाघांची संख्या  वाढत असल्याने निर्माण होणाऱ्या मानव-वन्यजीव  संघर्षांवर  उपाययोजना सुचवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने  यासंदर्भात आपले धोरण निश्चित करावे अशा सूचनाही  मुख्यमंत्र्यांनी दिल्या. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत सध्या ९३९ गावांचा समावेश असून योजनेत आणखी काही गावांचा समावेश करण्यात यावा तसेच योजनेत स्थानिकांना उपयुक्त ठरणाऱ्या आणखी कोणत्या गोष्टी देता येतील याचा विचार केला जावा, असे मुख्यमंत्री म्हणाले. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यतील वाढती वाघांची संख्या व होत असलेला मानव-वन्यजीव संघर्ष याची माहिती यावेळी दिली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून आणखी काही गावांचा त्यात समावेश करावा, या योजनेत कौशल्य विकासाचा समावेश करून वनौपजावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थानिकांना उपलब्ध करून द्यावेत, जिल्ह्यत निसर्ग पर्यटन वाढवले जावे, त्यामुळे त्यांच्या हाताला रोजगार मिळू शकेल असे त्यांनी सांगितले. त्यांनी जिल्ह्यतील काही वाघ इतरत्र स्थानांतरीत करण्याची मागणीही यावेळी केली.

सोलर बोअरवेल

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत वनालगत असलेल्या पाच संवदेनशील गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वन सीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी  दिले. चंद्रपूर जिल्ह्यत २१८ ठिकाणी सोलर बोअरवेल तयार करून त्यावर खोदतळे निर्माण करण्यात यावेत. यासाठी लागणारा सहा कोटी रुपयांचा खर्च कॅम्पा निधीतून करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.