गायरान जमिनीचे वाटप आणि सिल्लोड महोत्सवावरून कृषीमंत्री अब्दुल सत्ता यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. त्यातच मंत्री संजय राठोड यांनीही गायरान जमीन मातीमोल भावात खासगी व्यक्तीला दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी शिंदे-भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. टीव्ही ९ मराठीशी बोलताना रोहित पवार म्हणाले, "खरेतर तीन भूखंडाचा विषय आहे. त्यामध्ये एनआयटीपासून अब्दुल सत्तार आणि संजय राठोडापर्यंत त्याचा समावेश आहे. अब्दुल सत्तार यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. सगळे पुरावे समोर असताना एखाद्या नेत्याची पाठराखण केल्याने वेगळा संदेश जातो. पण, आता त्यांचं मंत्रीपद काढून घेतलं जाण्याची गरज आहे." हेही वाचा : “काय बोलताय याचं भान ठेवा,” मिटकरींनी मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानानंतर CM शिंदेंनी खडसावलं एकनाथ खडसेंवर आरोप झाल्यावर त्यांचं मंत्रीपद काढण्यात आलं होतं. तसेच, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घ्यावा, असा प्रश्न विचारल्यावर रोहित पवारांनी सांगितलं, "सरकारमध्ये खूप गोंधळ आहे. हे सरकार बदला घेण्यासाठी स्थापन झालं आहे. ४० लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे, तर भाजपाच्या आमदारांची काळजी देवेंद्र फडणवीस घेत आहेत. पण, यांची काळजी घेताना महाराष्ट्राचे प्रश्न बाजूला राहत आहेत." हेही वाचा : कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर झाल्यावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… "त्यामुळेच अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही. कारण, त्यांच्यावर कारवाई केली तर आमदारांमध्ये नाराजी पसरेल. मग, बदला घेण्यासाठी स्थापन झालेल्या सरकारमध्ये अडचण निर्माण होईल," असेही रोहित पवारांनी सांगितलं.