नागपूर: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात, यासाठी पक्षातील बहुतांश आमदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र, काही मोजक्या जणांनी या प्रस्तावाला समर्थन देण्यासाठी स्वाक्षरी केल्या नाहीत. ते पदाधिकारी आणि आमदार कोण, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. यावर आता विविध राजकीय चर्चा रंगल्या आहेत. यावर भाजप नेते आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली.
रोहित पवार यांनी बुधवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण आणि अन्य बाबींवर भाष्य केले.
यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा दावा केला. सुनेत्रा पवार यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करावे, यासाठी मोजक्या लोकांनी समर्थन दिले नसल्याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांशी बोलल्यावर तुम्हाला कळेल. सुनेत्रा काकी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केल्यात असे नाही. ३५ आमदारांनी या प्रस्तावावर सह्या केल्या होत्या, असे आम्हाला कळते. त्या ३५ आमदारांपैकी एखाद्याला जाऊन विचारा, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट सांगतील.
याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा काकींसाठीच सह्या केल्या आहेत. ज्यांनी सह्या केल्यात त्यांना तुम्ही विचारा. ज्यांनी सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या प्रस्तावावर सह्या केल्या नाहीत, त्यांनी का केल्या नाहीत आणि ते आमदार किंवा पदाधिकारी कोण आहेत, हा संशोधनाचा विषय असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. येत्या २६ फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होईल, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी अलीकडेच दिली होती. मात्र, त्यापूर्वी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आरोप झाले होते. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर थेट भाष्य केले होते. मला आज विलिनीकरणावर अधिकचं बोलायचं नाही, असे म्हणत त्यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होते असे म्हटले. अजित दादा आज नाहीत, त्यामुळे त्यावर चर्चा करणं योग्य नाही. मात्र, दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित दादांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात अनके बदल करायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी कोणीतरी तरुण असावं असं त्यांना वाटत होतं. अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळेच अमोल कोल्हे अनेक बैठकांमध्ये होते. त्यादृष्टीने चर्चा होत होत्या. पण आज दादा राहिले नाहीत, ज्यांच्यासोबत आम्हाला कंफर्ट होता. त्यांची भावनिक इच्छा होती, राजकीय इच्छा दुय्यम होती. दोन्ही पक्ष कुटुंब एकत्र यावेत असं त्यांना वाटत होते, असा दावा रोहित पवार यांनी केला होता. यासंदर्भात पंकज भोयर म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाने कुणाला अध्यक्ष करावे हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यावर आम्ही प्रतिक्रिया देणे योग्य राहणार नाही, असे सांगत भोयर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विषयावर बोलण्यास नकार दिला.

