शहरात मुलांना पळवून नेणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून शाळेतून मुलांना चोरून नेत असल्याच्या अफवा सध्या राज्यभर पसरत आहेत. त्यामुळे राज्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अशा घटना घडल्या नसून अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा- नागपुरात संघाच्या विजयादशमी उत्सवाला संतोष यादव प्रमुख पाहुण्या

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरविणारे संदेश, छायाचित्र आणि चित्रफीत सध्या अनेकांच्या मोबाईलमध्ये फिरत आहे. चित्रफितीत यात काही जण एकाला मारहाण करीत असून ते लहान मुलांना पळवून नेताना आढळून आल्याचे दाखविण्यात येत आहे. या टोळीतील अन्य सदस्य शहरात फिरत असल्याचे सांगण्यात येत आहे. या अफवेतून चार साधूंना तर अन्य एका घटनेत तृतीय पंथियाला मारहाण झाली. तिच चित्रफीत दाखवून लहान मुलांना पळवून नेणारी टोळी शहरात सक्रिय असल्याची अफवा पसरली जात आहे. मात्र, ही चित्रफित खोटी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

हेही वाचा- राज्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत घट; सात महिन्यांत केवळ २ हजार बाधित; आरोग्य विभागाला दिलासा 

…तर गुन्हा दाखल होणार

मुले पळविणाऱ्या टोळीबाबत सामाज माध्यमावर संदेश, छायाचित्र आणि चित्रफीत प्रसारित करून दहशत पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कुणीही अशा प्रकारचे संदेश एकमेकांना पाठवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरात कोणतीही टोळी नाही. मुले चोरून नेतात, ही अफवा आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. मुले चोरी करणाऱ्या टोळीबाबत संदेश आल्यास तत्काळ डिलिट करा. इतरांना पाठवू नका, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.