चंद्रपूर: समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूर शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १०६ जवळ भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेमुळे चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील डी.एड. कॉलेजजवळ राहणारे जीवने कुटुंबीय रविवारी अकोला येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी वॅगनार कारने निघाले होते. धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १०६ परिसरात त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव वेगात जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये आरती जीवने (४०), भास्कर जीवने (५७), महादेव जीवने (४२), लता जीवने (४३) आणि त्रिशा जीवने (१२) (सर्व रा. डी.एड. कॉलेजजवळ, बाबुपेठ, चंद्रपूर) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

प्राथमिक तपासात भरधाव वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून कार उभ्या कंटेनरवर आदळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण, कंटेनरची उभी करण्याची परिस्थिती, रस्त्यावरील सुरक्षिततेचे नियम पाळण्यात आले होते का, तसेच इतर तांत्रिक बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दुर्घटनेची माहिती चंद्रपूरमध्ये पोहोचताच बाबुपेठ परिसरात शोककळा पसरली. एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.