नागपूर : वाहतुकीचे उल्लंघन होऊ नये, यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर ‘हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (एचटीएमएस) गॅन्ट्री बसविण्याचे काम आज, शनिवारपासून सुरू होत आहे. तीन फेब्रुवारीपर्यंत टप्प्याटप्प्यात महामार्ग काही काळासाठी बंद राहील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सांगितले.
वाहतुकीचे नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी समृद्धी महामार्गावर ‘हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ म्हणजेच (एचटीएमएस) गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नागपूर जिल्ह्यात ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) १४ टप्प्यात गॅन्ट्री उभारण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुका व वर्धा जिल्ह्यातील सेलू, आर्वी व वर्धा तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावर ही यंत्रणा बसविण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या कामादरम्यान संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णता थांबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत प्रस्तावित वेगमर्यादा ताशी १२० किलोमीटर ठेवण्यात आली असून, विविध ठिकाणी आधुनिक नियंत्रण केंद्रे आणि पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. महामार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी एकूण २९४ गॅन्ट्री व त्यांची पायाभरणी करण्यात आली असून, यामध्ये वेग मोजणी उपकरणे, व्हिडिओ इन्सिडेंट डिटेक्शन सिस्टीम, लेन कंट्रोल सिस्टीम आणि व्हेरिएबल मेसेज साइन यांचा समावेश आहे, असे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आता वाहतूक वाढली आहे.
मुंबई, पुणे, शेगावला रस्ते मार्गाने जाणारे नागरिक आता समृद्धीचा वापर करू लागले आहेत. वेळेची बचत आणि स्वतःच्या वाहनाने प्रवास हे त्यामागील एक कारण आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दिवाळी, ख्रिसमस, उन्हाळा या कालावधीत या महामार्गावर प्रचंड वर्दळ असते.त्यामुळे वाहतुकीचे उल्लंघन होऊ नये यासाठी ‘हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ बसवण्यात येत आहे.
या कालावधीत बंद
वर्धा तालुक्यात दुपारी १२ ते १ आणि दुपारी ३ ते ४ या कालावधीत नागपूरकडे येताना, सेलू तालुक्यात दुपारी १२ ते १ या वेळेत मुंबईकडे जाणारा तसेच सेलू तालुक्यात दुपारी ३ ते ४ या वेळेत नागपूरकडे येताना, हिंगणा तालुक्यात दुपारी १२ ते १ या वेळेत नागपूरडे येताना, हिंगणा तालुक्यात दुपारी ३ ते ४ या वेळेत मुंबईकडे जाताना आणि आर्वी तालुक्यात दुपारी ३ ते ४ या वेळेत मुंबईकडे जाताना बंद राहील.

