गडचिरोली: आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुधोली रिठ येथील विद्यमान सरपंचाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. मंगलदास आत्राम (४०, रा. मुधोली रिठ ता. चामोर्शी) असे त्या सरपंचाचे नाव आहे.
मृतक मंगलदास हे सकाळच्या सुमारास घराबाहेर पडले. मुधोली चक क्र. २ मधील एका शेतकऱ्याच्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. याची माहिती होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आष्टी पोलिस देखील तातडीने पोहोचले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कुटुंबाचा आधार गेला
मंगलदास हे आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे सर्व परिचित होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी गावात बरीच विकासकामे केली. त्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. घरात ते एकटे कमावते होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधार हरवला आहे.
चामोर्शी तालुक्यात काही दिवसांपूर्वी मुलाने केली होती वडिलांची हत्या करुन मित्राच्या मदतीने मृतदेह जंगलात फेकला. त्यानंतर वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. १५ दिवसांनी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली, त्यामुळे भंडाफोड होण्याच्या भीतीने हादरलेल्या मुलाने चिचडोह बॅरेजमध्ये उडी घेतली. मात्र, सुदैवाने तो वाचला.पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर अखेर त्याने वडिलांच्या हत्येची कबुली दिली. चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील मर्डर मिस्ट्रीच्या थरारपटाचा २ मे रोजी उलगडा झाला. पोलिसांनी मुलासह त्याच्या मित्राला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रेवनाथ लक्ष्मण कोडापे(५५ , रा. मार्कंडादेव, ता. चामोर्शी असे मयताचे नाव आहे. मुलगा आकाश रेवनाथ कोडापे ( २९ ) व त्याचा मित्र लखन मडावी (२५ , रा. गडचिरोली) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
रेवनाथ हे मार्कंडादेव येथील देवस्थानच्या यात्री निवासमध्ये मजुरी काम करत. मुलगा आकाश हा देखील मजुरीकाम करायचा. पिता- पुत्रांमध्ये सतत वाद होत. वडील सतत शिवीगाळ करतात, त्यामुळे आकाशच्या मनात राग होता. त्यातच आकाशने पैसे मागितल्यामुळे देखील वडिलांसोबत त्याचा वाद झाला होता. १५ एप्रिल रोजी पिता- पुत्रात वादाची ठिणगी पडली. हा वाद विकोपाला गेला. या वादात मुलगा आकाशने ओढणीने गळा आवळून वडिलांची हत्या केली.