नागपूर : वनखात्याच्या कांदळवन कक्षाने ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग करुन त्या माध्यमातून समुद्रातील त्यांचा भ्रमणमार्ग शोधण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. यामधील पाच कासवांपैकी चार कासवांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता अर्ध्यावरच राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या स्थलांतरित हालचालींचा मागोवा घेण्यासाठी कांदळवन कक्षाद्वारे संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून पाच कासवांना टॅिगग करण्यात आले. वेळास येथे मादी कासवाला जानेवारी २०२२ मध्ये उपग्रह टॅग करण्यात आले. तिला ‘प्रथमा’ हे नाव देण्यात आले. तर रेवा, सावनी, लक्ष्मी आणि वनश्री ही उपग्रह टॅिगग करण्यात आलेल्या इतर कासवांची नावे होती. पहिल्यांदा १ मार्चला ‘लक्ष्मी’ या कासवाचा संपर्क तुटला. त्यानंतर २४ मे रोजी ‘प्रथमा’, ४ जूनला ‘सावनी’ आणि आता २२ जूनला ‘रेवा’ संपर्कक्षेत्राच्या बाहेर आहे. आता ‘वनश्री’ कासवाकडून माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.