नागपूर: ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यामध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्चला सायबर पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली. सध्या बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकास मान्यता दिल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार झाली. ‘शालार्थ आयडी’ निर्माण करण्याचा अधिकार नरड यांना असताना त्यांच्या पासवर्डचा दुसऱ्याने गैरवापर करून ‘शालार्थ आयडी’ तयार केल्याचे या तक्रारीत नमूद आहे. नरड यांना अटक होण्यापूर्वी ही तक्रार झाल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सध्या शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि मुख्याध्यापक पुडके, निलेश मेश्राम, अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग, संजय दुधाळकर, शिक्षण उपनिरीक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालय, सुरज नाईक, वरिष्ठ लिपीक शिक्षण उपसंचालक कार्यालय यांची कारागृहात रवानगी केली आहे. नरड यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. परंतु, सायबर पोलिसांच्या हातात नवीन पुरावे लागले असून पुढील तपासासाठी ते नरड यांना अटक करणार आहेत. तर शिक्षक भरती घोटाळ्यात संशय असलेले दोन शिक्षणाधिकारी आणि एक वेतन पथकाचे अधिकारी बेपत्ता असल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहिती अहवालानुसार, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यावेळी उपसंचालक कार्यालयाने २११ प्राथमिक शिक्षक, २ मुख्याध्यापक, १८ कनिष्ठ लिपिक, १३ शिपाई अशी २४४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी दिली होती. या यादीनुसार सर्व प्रस्तावांची चौकशी केली असता ३१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या‘शालार्थ आयडीं’ना उपसंचालक कार्यालयाने मान्यता दिली होती. उर्वरित ‘शालार्थ आयडी’ची मान्यता नसताना पासवर्डचा गैरवापर करून ते तयार करण्यात आल्याचा आक्षेप या तक्रारीमध्ये आहे. विशेष म्हणजे, नरड यांना अपात्र मुख्याध्यापकाचा ‘शालार्थ आयडी’ तयार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. असे असताना त्यांच्या पासवर्डचा गैरवापर झाला असा दावा नरड करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यानंतर आता सायबर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आहे. त्यांच्या हातात अनेक नवीन पुरावे लागले असून नरड यांना आता सायबर पोलीस अटक करणार आहेत.
चौकशी सुरू असताना अहवाल का?
‘शालार्थ आयडी’चा गैरवापर झाल्याच्या प्रकरणात चिंतामण वंजारी यांची चौकशी सुरू असताना त्यांचा अहवाल शिक्षण आयुक्तांकडे सादर होण्यापूर्वीच उपसंचालक नरड यांनी इतरांवर आरोप करणारा अहवाल का दिला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आधीच्या तपासणी समितीने काय केले?
‘शालार्थ आयडी’मध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप दोन वर्षांआधी करण्यात आला होता. तसेच माजी उपसंचालक वैशाली जामदार यांच्या विरोधातही तक्रार झाली होती. नरड अमरावती शिक्षण मंडळात सचिव असताना त्यांनी या प्रकरणात चौकशी केली होती. परंतु, पुढे काहीच झाले नाही. विशेष म्हणजे, शिक्षण आयुक्तांनी बनावट ‘शालार्थ आयडी’च्या प्रकरणात दोन तपास समिती नेमल्या होत्या. या समित्यांनीही काहीच कारवाई का केली नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.