नागपूर: मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्रानंतर भाजपने अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून माघार घेतली. यासाठी राज ठाकरे यांचे आभार मानावे लागू नये म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आवाहन करण्यास सांगण्यात आले, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी येथे केला.

हेही वाचा >>> समृद्धी महामार्ग : दिवाळीआधी राज्यातील जनतेला शिंदे सरकारकडून मोठं गिफ्ट? पंतप्रधान कार्यालयाच्या उत्तराची प्रतीक्षा

देशपांडे हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यासाठी नागपुरात आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दिवंगत लोकप्रतिनिधीच्या कुटुंबियांतील व्यक्ती पोटनिवडणूक लढवत असल्यास ती बिनविरोध करून राज्यातील परंपरेचे पालन करावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी भाजपला पत्र पाठवून केले होते. त्यानंतर याच संदर्भात पत्रकार परिषद घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही हीच मागणी केली होती. राज ठाकरे यांच्या सूचनेबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानुसार भाजपने उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलताना देशपांडे म्हणाले, राज ठाकरे यांनी पत्र लिहले. त्यानंतर शरद पवार यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद पवार यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी घ्यायला लावली, असा दावा त्या पक्षाचे नाव घेता देशपांडे यांनी केला.

हेही वाचा >>> नागपूर : दुष्काळ जाहीर न झाल्यास दिवाळीत आंदोलन; नाना पटोले

नागपुरात मनसे कार्यालयाची स्थापना होणार

नागपुरात मनसे कार्यालयाची स्थापना विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी केली जाणार आहे. या कार्यालयाचे उद्घाटन पक्ष प्रमुख राज ठाकरे हस्ते होईल. गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यात पक्षाची नागपूर शहर कार्यकारणी बरखास्त केली होती. नवीन पदाधिकऱ्यांचा नेमणुका करण्यासाठी बैठक आहे. त्यात त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> विश्लेषण : हिजाब कधी हवा कधी नको? इराणमधील महिलांच्या हिजाब आंदोलनाचा इतिहास काय?

राऊत यांच्याकडे कारागृहात वेळच वेळ

राज ठाकरेंनी पत्र लिहल्यावर भाजपने उमेदवारी मागे घेतली, हे सर्व ठरवून करण्यात आले, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. याबाबत देशपांडे म्हणाले,  राऊत साहेबांचा कारागृहात वेळ जात नाही म्हणून ते तेथे बसून ‘स्क्रिपटिंग’ करतात आणि आमच्यावर ‘स्क्रिपट’ लिहिल्याचा आरोप करतात. आतमध्ये पुस्तकसुद्धा लिहित असल्याची माहिती आहे.