शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 'बेबनाव' असल्याचा मोठा दावा केला आहे. तसेच त्यामुळेच उद्धव ठाकरे राष्ट्रवादीबरोबर राहण्याऐवजी काँग्रेसबरोबर राहत असावेत, असंही संजय शिरसाटांनी म्हटलं. ते मंगळवारी (२० डिसेंबर) नागपूरमध्ये अधिवेशनासाठी आले असताना विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी बोलत होते. संजय शिरसाट म्हणाले, "उद्धव ठाकरेंचं नागपूरमध्ये आगमन झालं. मी टीव्हीवर त्यांचं जंगी स्वागत होताना पाहिलं. काल महाविकासआघाडीची बैठक होती, ती झाली नाही. आज ती बैठक झाली असं कळालं. परंतु दुर्दैवाने असं सांगावं लागेल की, उद्धव ठाकरे ज्या पक्षाचं नेतृत्व करत आहेत, त्याच पक्षाच्या कार्यालयात ते गेले नाही. ते काँग्रेसच्या कार्यालयात गेले." "उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 'बेबनाव' आहे" "उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली, पण पक्षाच्या कार्यालयाकडे ते फिरकले सुद्धा नाही. मला वाटतं, उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेबनाव आहे. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर राहण्याऐवजी काँग्रेसबरोबर राहण्याचा उद्धव ठाकरेंचा मनोदय असावा," असं म्हणत संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. "…तर उद्धव ठाकरेंचा गट काँग्रेसच्या चिन्हावर लढेल" "पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. त्या सुनावणीत चिन्ह भेटलं नाही, तर उद्धव ठाकरेंचा गट काँग्रेसच्या चिन्हावर लढणार तर नाही ना अशी शंका येत आहे. म्हणूनच आज उद्धव ठाकरे विधानभवनात आले आणि विधान परिषदेत ते जाणार आहेत," असं मत शिरसाटांनी व्यक्त केलं. "राजीनामा दिला म्हणणारे उद्धव ठाकरे विधानपरिषदेत आले, म्हणजे…" संजय शिरसाट पुढे म्हणाले, "ठाकरे कुटुंब एकदा दिलेला शब्द कधी मोडत नाही. मात्र, उद्धव ठाकरेंनी मी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असं विधान केलं होतं. आज तेच उद्धव ठाकरे विधान परिषदेत आले आहेत. म्हणजे त्यांनी आज कोणाचं ऐकावं हाही त्यांच्यासमोर पडलेला प्रश्न आहे. कधी संजय राऊत, कधी शरद पवार, कधी अजित पवार, कधी काँग्रेस, कधी राहुल गांधी अशा द्विधा मनस्थितीत ते आहेत. म्हणून ते नागपुरात आले तर त्यांचं स्वागत करुयात." हेही वाचा : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाकडून सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा, संजय राऊत म्हणाले, “शिंदे गटाला…” "निवडणुकीत ठाकरे गट चौथ्या क्रमांकावर" "ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांनी पाहिलं की ठाकरे गट चौथ्या क्रमांकावर आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये ते चौथ्या क्रमांकाच्या खाली जाऊ नयेत, अशी ईश्वराकडे प्रार्थना करुयात," असा टोला शिरसाटांनी ठाकरे गटाला लगावला.