उपराजधानीत १७ सप्टेंबरपासून ‘अग्निवीर’ सैन्य भरती मेळावा येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला आहे. यासाठी विदर्भातील सुमारे ६० हजार तरुण येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.या मेळाव्यासाठी विदर्भातील १० जिल्ह्यातील तरुणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.

त्यात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागपूर जिल्ह्यातील तरुणांचा समावेश आहे.
प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या तरुणांची शारीरिक चाचणी व अन्य चाचण्या येथे घेतल्या जाणार असून त्यासाठी जिल्हानिहाय दिवस निश्चित करून देण्यात आले आहे. मुलांना आणणे व पोहचवून देण्याची तसेच त्यांच्यासाठी लागणारी अन्य व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार आहे.

हेही वाचा : मायावती – प्रकाश आंबेडकरांकडून आघाडीसाठी हालचाली?

सैन्य भरतीसाठी येणाऱ्या सैन्य अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याचे इटनकर यांनी सांगितले. बाहेरगावहून येणाऱ्या तरुणांसाठी विशेष एस.टी. बसची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनांसाठी वाहतळांची व्यवस्था कस्तुरचंद पार्कवर करण्यात आली आहे. याविषयी १५ आणि १६ तारखेला रंगीत तालीम करण्यात येणार आहे, असे इटनकर यांनी सांगितले.