भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरमध्ये संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना एक मोठं विधान केलं होतं. “मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, असं ते म्हणाले होते. तेली समाजाचा हा कार्यक्रम होता आणि यासाठी मोठ्यासंख्येने ओबीसी प्रवर्गातील नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवाय विरोधकांकडून यावरून भाजपावर टीका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज(सोमवार) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या विधानाबाबत खुलासा केला. “देवेंद्र फडणवीस मुख्यमत्री असताना त्यांनी सर्व समाजाला पुढे आणले. २०१९ मध्ये आम्हाला जनतेने कौल दिला होता. म्हणून मी अध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी मी भावना व्यक्त केली.” असं बावनकुळे यांनी सांगितलं. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या नागपुरात आयोजित बैठकी दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये आणि प्रदेश समन्वयक विश्वास पाठक उपस्थित होते. याशिवाय “राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले आणि परिवर्तन झाले. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी संघटना पूर्ण ताकदीने काम करणार आहे. आजच्या दिवसभराच्या बैठकीत या विषयावर आणि संघटनात्मक बळकटीवर चर्चा करण्यात येत आहे. २०२४ साली निवडणुकीला सामोरे जाताना जनसामान्यांशी संपर्क साधून पक्ष संघटना बळकट करत आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा राज्यात ताकदीने उभी राहील यासाठीची योजना अंमलात आणत आणत आहोत.” असंही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले. सचिन सावंत यांनी केली टीका - “राक्षसी सत्ताकांक्षा असलेल्या भाजपाच्या पोटातील ओठांवर आले आहे. मुख्यमंत्रीपदाचा आम्हाला सन्मान आहे पण खेदाने सांगावेसे वाटते की भाजपा नेत्यांकडून सतत येणारी विधाने पाहिली तर भाजपाच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वॉचमन आहेत. ही तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था आहे.” असं सचिन सावंतांनी म्हटलं आहे.