नागपूर : संरक्षण दलात अग्निवीर म्हणून नियुक्त झाल्यावर चार वर्षांनी सेवामुक्त होणाऱ्यांसाठी नागपुरातील अंबाझरी यंत्र इंडिया लि. (जुने नाव आयुध निर्माणी बोर्ड) येथे विशेष कौशल्यावर आधारित पदविका, पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सबंधितांना सशास्त्र निर्मिती कारखान्यांमध्ये नोकरी किंवा व्यवसाय सुरू करता होऊ शकेल, अशी माहिती यंत्र इंडिया लिमिडेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव पुरी यांनी येथे दिली.केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्यभरती ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली. त्यासाठी भरती प्रक्रिया देखील सुरू झाली. प्रत्येक तुकडी (बॅच)मधील २५ टक्के अग्निवीरांची सैन्यदलात नियमित सेवेसाठी निवड केली जाणार असून इतर ७५ टक्के अग्निवीर सेवामुक्त होणार आहे.

त्यांच्यासाठी नागपूर येथील अंबाझरीतील यंत्र इंडिया लिमिडेटमध्ये औद्योगिक प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी पदविका आणि पदवी अभ्यासक्रम पुढील चार वर्षात तयार केला जाईल.ज्या अग्निवीरांना संरक्षण दलात तांत्रिक तसेच अभियांत्रिकीचा अनुभव असेल त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम म्हणजे त्यांच्या कौशल्याचे श्रेणीवर्धन करणारा ठरेल. या अभ्यासक्रमामुळे संरक्षण दलातील सेवामुक्त अग्निवीरांना संरक्षण क्षेत्रातील उद्योगात समावून घेतले जाऊ शकेल. अंबाझरी येथील प्रशिक्षण प्राप्त अग्निवीरांना महाराष्ट्रासह इतर ठिकाणी काम करणे शक्य होणार आहे, असेही पुरी म्हणाले.

हेही वाचा… पाच महिन्यांपासून बी.ए., बी.ई. प्रथम सत्राचे निकाल लागेना

यापूर्वी शिक्षण मंत्रालयाने अग्निवीरांसाठी तीन वर्षाचा विशेष कौशल्यावर आधारित पदवी अभ्यासक्रम आणण्याचा निर्णय घेतला होता. यात अग्निवीरांना चार वर्षांच्या सेवेदरम्यान शिक्षण घेतलेल्या तांत्रिक कौशल्याला प्राधान्य दिले जाणार आहे.अग्निवीरांसाठी दहावी उत्तीर्ण अट असल्याने चार वर्षांच्या सेवेनंतर त्यांना बारावीच्या समतुल्य प्रमाणपत्र दिले जाईल.