लोकसत्ता टीम
वर्धा: नेहमीची आवक तर थांबलीच, पण आर्थिक वर्षाची अखेर म्हणून मार्च महिन्यात होणारी कर वसुलीची धडक मोहिमही संपामुळे थांबली. करस्वरूपात येणारी कोट्यवधी रुपयांची आवक थांबल्याने पालिकांच्या तिजोऱ्यांमध्ये ठणठणाट आहे.
संपावर असणाऱ्या कर विभागात कार्यरत एका कर्मचाऱ्याने सांगितले की, तात्पुरते कर्मचारी बसवून करपट्टी स्वीकारल्या जात आहेत. पण या महिन्यात होणारी थकबाकीची सक्तीची वसुली थांबल्याने दैनंदिन दहा ते पंधरा लाख रुपयांची आवक बंद पडली आहे. वेतनपोटी शासन ऐंशी टक्के तर उर्वरित वीस टक्के कर रकमेतून घेत कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाते. त्यामुळे पुढील पगाराचे काय, याची तमा न बाळगता पालिका कर्मचारी संपात सामील आहे.
जिल्ह्यातील सहा नगर परिषद व चार नगर पंचायतीतील करवसुली जवळपास ठप्प पडली आहे. हा पैसे कोट्यावधी रुपयांच्या घरात जातो. ‘मार्च एंडिंग’ हातून गेल्यास पुढे कसे होणार, याची चिंता प्रशासनास लागली आहे.