चंद्रपूर : राजुरा एस.टी. आगारात तिकीट निरीक्षक पदावर कार्यरत एका कर्मचाऱ्याने रविवारी रात्री आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आगारातील एटीआय टाले आणि चालक कोवे हे वारंवार पैशांची मागणी करीत होते. त्यांच्या त्रासामुळेच मी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख त्यांनी आत्महत्यापूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. भगवान अशोक यादव (३०), असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

यादव राजुरा येथील एसटी आगारात कार्यरत होते. ते बल्लारपुरातील शिवनगरात आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. राजुरा आगारातील एटीआय टाले आणि चालक व्ही. एल.कोवे भगवान यादव यांना नेहमीच त्रास द्यायचे. दर महिन्याला दहा हजार रुपयांची मागणी करायचे. पैसे न दिल्यास भगवान यादव यांना त्रास द्यायचे, असा आरोप यादव कुटुंबीयांनी केला आहे. मृताच्या खोलीत एक चिठ्ठी आढळली. त्यात राजुरा एस. टी. आगारातील एटीआय टाले या महिला अधिकारी आणि चालक व्ही.एल. कोवे हे दोघे माझ्याकडून वारंवार पैसे मागत आहे. त्यांनी दिलेल्या नाहक त्रासामुळे मी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. टाले आणि व्ही.एल. कोवे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. घटनेचा तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

मृताने आत्महत्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठीतील आरोप गंभीर असून तपासाअंती सत्य बाहेर येईल. – शैलेंद्र ठाकरे, तपास अधिकारी