व्यवस्थापनाकडून दडपशाहीचा वापर होत असल्याचा हनुमंत ताटेंचा आरोप

राज्यातील सर्व एसटी कामगार विविध न्याय मागण्यांकरिता १७ ऑक्टोंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. कर्मचारी संपावर जावू नये म्हणून प्रशासनाकडून दडपशाहीचा वापर सुरू झाला आहे. परंतु हा संप अटळ असून कर्मचाऱ्यांनी त्यासाठी तयार राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी रविवारी नागपूरातील तुळशीबाग येथे आयोजित मेळाव्यात केले.

अनेक वर्षांपासून शासनाकडे एसटी कामगारांनाही सेवाजेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी, ७ वा वेतन आयोग लागू करावा आणि इतर मागण्या केल्या जात आहे. परंतु आश्वासनाच्या व्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. या विषयावर संघटनेने बरेच आंदोलन केले. शासनाला वेळोवेळी निवेदन सादर केले, परंतु त्याचाही सरकारवर परिणाम होत नाही. शेवटी स्वतचा हक्क मिळवण्याकरिता एसटी कामगारांना हे आंदोलन करावे लागत आहे. एसटी कामगारांचा प्रस्तावित संप मोडून काढण्याकरिता शासन आणि व्यवस्थापनाकडून प्रयत्न सुरू आहे. परंतु संप अटळ असून कर्मचाऱ्यांनी आपली ताकद दाखवण्याची आता खरी गरज असल्याचे हनुमंत ताटे म्हणाले.

केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे, केंद्रीय कार्याध्यक्ष सदाशीव शिवणकर, प्रादेशिक सचिव पुरूषोत्तम इंगोले यांनीही यावेळी भूमिका मांडली. प्रास्ताविक विभागीय सचिव अजय हट्टेवार यांनी तर संचालन राजू मुंडवाईक यांनी केले. आभार प्रशांत बोकडे यांनी मानले. याप्रसंगी सुभाष वंजारी, शशी वानखेडे, प्रज्ञाकर चंदनखेडे, सुशील झाडे, दत्ता बावणे, राजू करपते, सुनील पशीने, नत्थू तडस, प्रशांत निवल, अब्दुल कलाम, नरेंद्र भेलकर, मनोज बघले, दिलीप माहुरे, प्रदीप वाघ, सुधीर नांदगावे, किशोर शिंदे, गणेश मेश्राम, लव्हाळे, गजू शेंडे यांच्यासह एसटी कामगार संघटनेचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.