अकोला : राज्यातील सुरक्षा रक्षक आता ‘खाकी वर्दी’मध्ये दिसणार आहेत. याचा अर्थ सुरक्षा रक्षक पोलीस दलात जाणार असा नसून त्यांच्या गणवेशाचा रंग खाकी राहणार आहे. नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास राज्य शासनाने मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो व नाव असेल. कामगार दिनाचे औचित्य साधून हा खाकी गणवेश १ मेपासून राज्यभरात अंमलात येणार आहे.
सुरक्षा रक्षकाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांचे आणि सामानाचे संरक्षण करणे आहे. मालमत्तेची सुरक्षा, आपत्कालीन बचाव, आपत्कालीन व्यवस्थापन सेवा, सुरक्षा गस्त, गुन्ह्यांना सक्रियपणे रोखणे, संशयास्पद हालचालींवर काळजीपूर्वक लक्ष ठेवणे, एखादी समस्या उद्भवल्यास कारवाई करणे, हस्तक्षेप करणे किंवा पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करणे आदी त्यांचे कर्तव्य आहेत. कोणत्याही सुरक्षा रक्षकासाठी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सतर्क राहणे आहे.
नेहमी सतर्क राहिल्याने संभाव्य धोके वाढण्यापूर्वी ते ओळखण्यास मदत होते. रक्षकांनी नियमितपणे त्यांच्या सभोवतालच्या परिसराचे निरीक्षण केले पाहिजे, ज्यामध्ये लोक, वाहने आणि असामान्य वाटणाऱ्या हालचालींचा समावेश आहे. सुरक्षा रक्षक विशिष्ट कायदेशीर मर्यादेत काम करतात. ते संमतीशिवाय शोध घेऊ शकत नाहीत किंवा कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांची नक्कल करू शकत नाहीत.
सुरक्षा रक्षकांच्या गणवेशावरून अनेक वेळा संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते. आतापर्यंत सुरक्षा रक्षकांच्या गणवेशासाठी विशिष्ट असा रंग निश्चित केलेला नव्हता. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या गणेशाच्या रंग खाकी असावा, अशी मागणी विविध संघटना व सुरक्षा रक्षकांनी शासनाकडे केली होती. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही मागणी मान्य केली आहे. राज्यभरात जिल्हानिहाय १६ सुरक्षा रक्षक मंडळे कार्यरत असून आता १ मेपासून राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांच्या गणवेशात एकसमानता असणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी नव्याने निश्चित करण्यात आलेल्या खाकी रंगाच्या गणवेशाचे अनावरण कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरक्षा रक्षकांची ओळख एक समान राहणार
या उपक्रमामुळे सुरक्षा रक्षकांची ओळख एकसमान राहील व त्यांच्या शिस्तबद्धतेत भर पडेल. तसेच या नव्या गणवेशामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक सुसंगत व व्यावसायिक स्वरूप प्राप्त होणार असल्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी यावेळी सांगितले.