नागपूर: तुमचा मुलगा किंवा नातेवाईक जर यंदा अकरावीमध्ये प्रवेश घेणार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची  आहे. राज्य सरकारने अद्याप दहावीच्या निकालांची तारीख जाहीर केली नसली, तरी अकरावी प्रवेशासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत. यापूर्वी महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांचा ऑनलाईन प्रवेशामध्ये समावेश होता. यानंतर राज्यातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांसाठी हा नियम लागू करण्यात आला असून आता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी राहणार ते बघुया..

अशी राहिल ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 

(१) राज्यातील सर्व क्षेत्राकरीता उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळा/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय यांचेशी संलग्न सर्व शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील.

(२) राज्यातील अल्पसंख्यांक दर्जासह अन्य सर्व उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतूदी लागू राहतील.

(३) शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून राज्यातील राज्यमंडळ संलग्नित उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचे इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रीय पध्दतीने व ऑनलाईन प्रणाली द्वारा करण्यात यावे. तर शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून एसएसव्हीसी व्यवसायिक चे प्रवेश ऑफलाईन पध्दतीने होतील.

(४) खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालय यांनी विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयांना उपलब्ध करून देणे, विहित मुदतीत माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करणे, इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अनुषंगिक कामकाज विहित मुदतीत करणे, याबाबत शाळा स्तरावरील कामकाज पारदर्शकपणे करण्याची जबाबदारी खाजगी व्यवस्थापनाची असेल. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पारदर्शकपणे व गुणवत्तेच्या आधारे करण्यात यावी. 

(५) खाजगी व्यवस्थापनाने माहिती देण्यास विलंब करणे, टाळाटाळ करणे, खोटी/दिशाभूल करणारी माहिती सादर करणे, इत्यादीकरीता खासगी व्यवस्थापनास दंड आकारणे, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्रवेशास मनाई करणे, इत्यादी व आवश्यकतेनुसार  कारवाई करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

अर्ज करताना ही काळजी घ्या

(१) विद्यार्थ्यांना एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य व विज्ञान शाखांपैकी प्रत्येक फेरीमध्ये एका शाखेची निवड करता येईल. प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची मुभा असेल, विद्यार्थांना कोणत्याही एका शाखेकरिता अर्ज करता येईल.

(२) इयत्ता ११ वी प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे आवश्यक असेल. बनावट कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित केल्यास आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. इयत्ता १० वीच्या गुणपत्रिकेमध्ये फेरफार केल्यास इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रकियेतून सन २०२५-२६ करीता प्रतिबंधित करण्यात येईल.

(३) इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी प्रवेशाकरीता प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

(४) सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इ. ११ वी ऑनलाईन प्रवेशाकरिता पुढीलप्रमाणे फेऱ्यांचे नियोजन करण्यात येईल. सर्वसाधारण चार फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल. सर्व प्रवेश इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे करण्यात येतील. राज्य मंडळ संलग्नित इयत्ता १० वी मधील विषयांच्या उच्चतम ५ विषयांचे गुण गुणवत्तेकरीता विचारात घेण्यात यावेत. राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळांच्या माध्यमिक स्तरावरील इयत्ता १० मधील माहिती व तंत्रज्ञान किंवा तत्सम विषय वगळता अन्य ५ विषयांमधील उच्चतम गुण हे गुणवत्तेकरीता विचारात घेण्यात येतील. समान गुणवत्तेचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास जन्म दिनांकानुसार जेष्ठतम विद्यार्थ्यांच्या प्रवेशास प्राधान्य देण्यात येईल. या दोन स्तरावर (गुण व जन्मदिनांक) समान असल्यास विद्यार्थी, पालक, आडनाव इंग्रजीमध्ये घेऊन वर्णाक्षरांच्या क्रमानुसार जेष्ठतेनुसार प्रवेश करण्यात येतील.

(५) सर्वसाधारण ४ फेऱ्यांचे गुणवत्तेनुसार आयोजन करण्यात येईल. यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षण लागू असेल. तद्नंतर “सर्वांसाठी खुली या विशेष फेरीचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये ऑनलाईन पध्दतीने रिक्त जागा दाखविण्यात येतील. उर्वरीत रिक्त जागांकरीता दोन दिवसांचा कालावधी देऊन उच्च माध्यमिक शाळा/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना असेल. उपलब्ध रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज आल्यास केवळ इयत्ता १० वी च्या प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील. याकरीता संगणकीय प्रणालीचा व ऑनलाईन पध्दतीचा उपयोग करून प्रवेश देण्यात येतील.

(६) अल्पसंख्यांक कोटा अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोटा ५० टक्के असेल. या कोट्यामधील जागा शाळा व्यवस्थापनास सर्वसाधारण नियमित फेऱ्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असेल. सर्वसाधारण नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत अल्पसंख्यांक कोट्यातील जागा कोणत्याही परिस्थितीत प्रत्यार्पित करता येणार नाहीत. भरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येतील. 

(७) व्यवस्थापन कोटा सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना व्यवस्थापन कोट्याअंतर्गत ५ टक्के जागा आरक्षित असतील. या कोट्यातील जागा सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरता येतील. तद्नंतर तिसऱ्या फेरीच्या टप्यावर या कोट्यातील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी झाल्यास उर्वरित रिक्त जागा प्रत्यार्पित करणे अनिवार्य असेल. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना व्यवस्थापन कोटा लागू राहणार नाही.

प्रवेश रद्द करण्याचाही अधिकार

 महाविद्यालयात/शाळेत विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासून एकदा प्रवेश निश्चित केल्यास त्या प्रवर्गातील उमेदवारास प्रवेश रद्द करून दुसऱ्या ठिकाणी प्रवेश (गुणवत्तेनुसार) मिळाल्यास तो विद्यार्थी पात्र असेल, नवीन प्रवेशित उच्च माध्यमिक शाळा/ स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न उच्च माध्यमिक शाळा यामध्ये कागदपत्रे पडताळणीची आवश्यकता असणार नाही. तथापि मूळ कागदपत्रे नवीन प्रवेशित उच्च माध्यमिक शाळा/ स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालयात विहीत मुदतीत जमा करावी लागतील. प्रत्यक्ष प्रवेशावेळी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे स्वतःचा जातीचा दाखला असावा. विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला नसल्यास वडिलांचा जातीचा दाखला आरक्षित प्रवर्गाकरीता ग्राह्य धरता येईल.