दिवंगत बॉलिवूड अभिनेते सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 'AU' नावाने ४४ वेळा फोन आले होते. 'AU'चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे होतो, असं राहुल शेवाळेंनी लोकसभेत सांगितलं. राहुल शेवाळेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल शेवाळेंच्या आरोपानंतर शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "राहुल शेवाळेंचं डोकं फिरलं आहे. राहुल शेवाळेंची जीभ ठाकरे कुटुंबावर आरोप करताना चालली कशी, हा प्रश्न आहे. भाजपाच्या ताटाखालचे मांजर मिंधे गटात जाऊन राहुल शेवाळे झाले आहेत. कोणतीही चौकशी होऊद्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे निर्दोष आहेत," असं सुनील प्रभूंनी सांगितलं. हेही वाचा : राहुल शेवाळेंनी केलेल्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांचं लग्न आम्ही…” हेही वाचा : "ओढून ताणून ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी भाजपाचा अजेंडा आहे. तो अजेंडा राबवण्यासाठी मिंधे गटातील खासदाराला वापरण्याचं काम भाजपा करत आहे. लवकरच राहुल शेवाळेंना त्यांची जागा कळेल. महाराष्ट्रातील जनता हे बघत आहेत," असेही सुनील प्रभू म्हणाले. हेही वाचा : राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंबाबत केलेल्या खळबळजनक वक्तव्याला प्रियंका चतुर्वेदींकडून प्रत्युत्तर, म्हणाल्या… राहुल शेवाळे काय म्हणाले? “रिया चक्रवर्तीच्या फोन कॉल्सचा तपास केला गेला का? किंवा ती महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्याच्या संपर्कात होती, त्यांच्यात मैत्री होती, हे खरं आहे का? बिहार पोलिसांच्या तपासात ‘एयू’चा उल्लेख करण्यात आला. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रियाला ‘AU’ संपर्क क्रमांकावरून ४४ फोन कॉल आले. ‘AU’चा अर्थ ‘अनन्या उद्धव’ असा काढण्यात आला. पण बिहार पोलिसांनी केलेल्या तपासात ‘AU’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा काढण्यात आला आहे, याचाही तपास व्हायला हवा," अशी मागणी राहुल शेवाळेंनी लोकसभेत केली आहे. "‘AU’ हा विषय अतिशय गंभीर आहे. 'AU'चा अर्थ अनन्या उद्धव असा नाही, 'AU'चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, हे बिहार पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयचा तपास वेगळा आहे. त्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. याची माहिती लोकांना मिळायला हवी,” असेही राहुल शेवाळे यांनी म्हटलं.