अमरावती : अमरावतीसह राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपून तीन वर्षे झाली, तरी निवडणुका झालेल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश देत पुढील चार आठवड्यात निवडणुका घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून शहरातील प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. अमरावती महापालिका आणि जिल्हा परिषदेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. सुरुवातीला करोना, प्रभाग रचना आणि नंतर ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबलेल्या होत्या.

पण आता, चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने तयारीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी महापालिकेची अखेरची निवडणूक झाली होती. तब्बल आठ वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होणार आहे. गेल्या निवडणुकीत एकूण ८७ जागांपैकी भाजपला सर्वाधिक ४५, काँग्रेसला १५, शिवसेना ७, बसप ५ आणि इतर १५ जागा एमआयएम, अपक्ष आणि इतर पक्षांना मिळाल्या होत्या.

काँग्रेसचा झेंडा फडकणार – बबलू शेखावत

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो व स्वागत देखील करतो. महापालिका निवडणुकीकरिता अमरावती शहरातील काँग्रेस पक्ष तयार आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकणार आहे. महाराष्ट्र शासन आणि प्रशासन यांनी साफसफाई, मालमत्ता कर, बेरोजगारी, महागाई या सर्व मूलभूत सुविधांच्या बाबतीत अमरावती शहरातील जनतेचे हाल करून ठेवले आहेत. जनता यांना पूर्णपणे त्रस्त झालेली आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करताना निवडणुकीत अमरावती महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार, असा विश्वास काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी व्यक्त केला आहे.

गाडा सुरळीत होईल – चेतन गावंडे

स्थानिक स्वराज्य संस्था या संस्था लोकशाही पद्धतीने निवडलेल्या लोकप्रतिनिधींद्वारे चालवल्या जातात. लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधित्व करतात. ते त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि आकांक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचवतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्य नागरिकांचा आवाज म्हणून कार्यरत असतो. त्यामुळे या निवडणुकीनंतर नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत समजण्यास आणि ते पूर्ण तो कडे जाण्यास निश्चितच मदत होणार आहे. निवडणुकीनंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचा गाडा सुरळीत होईल, असा विश्वास माजी महापौर चेतन गावंडे यांनी व्यक्त केला आहे.