अनिल कांबळे
घरमालकाने गेल्या काही दिवसांपासून भाडेकरू दाम्पत्याचा मानसिक व शारीरिक छळ केला. त्यामुळे पती-पत्नीने त्रस्त होऊन चक्क आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्रास असह्य झाल्यानंतर थेट घरमालकाच्या नावे सुसाईड नोट लिहून पती-पत्नीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना कळमन्यातील गौरीनगरात घडली. मनोज वासुदेव लोधी (४५) आणि ममता मनोज लोधी (४०) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
लोधी दाम्पत्य हे गौरीनगर येथील इशपाक शेख यांच्या घरी भाड्याने रहात होता. मनोजला मुलगा आणि मुलगी आहे. मुलीचे लग्न झाले असून मुलगा गोंदिया येथे शिक्षण घेत आहे. मनोज हे वाहने खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होते. शेख यांच्याकडे आणखीही भाडेकरू होते. लोधी दाम्पत्य पाणी आणि वीज कमी प्रमाणात वापरत असले तरी त्यांना त्याचे जास्त पैसे द्यावे लागत असत. त्यामुळे त्यांचा शेख यांच्याशी वाद होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी कुणालातरी फोन केला. त्यानंतर स्लॅबच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरी बांधून दोघांनीही गळफास लावला.