वर्धा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या तसेच शासनाच्या इतर विभागाच्या शाळा पदभरतीसाठी अपेक्षित चाचणी कार्यक्रम घोषित केला आहे. या शाळांमध्ये पवित्र या सांगणकीय प्रणालीमार्फत शिक्षक भरतीसाठी ‘ शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२५ ‘ जाहीर केली. त्यासाठी ऑनलाईन प्रणाली अर्ज मागविण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी २६ एप्रिल ते १० मे अशी मुदत आहे. ऑनलाईन पद्धतीने नमूद परीक्षा शुल्क १० मे पर्यंत भरायचे आहे. परीक्षेच्या सात दिवस आधी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध करून घेता येईल. ऑनलाईन परीक्षा २४ मे ते ५ जून दरम्यान भौतिक सुविधा म्हणजे परीक्षा केंद्र व विद्यार्थी संख्येनुसार होणार आहे.एक खबरदारी घेण्याची सूचना आहे. २०१८ व २०१९ साली झालेल्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. संभाव्य प्रत्येक विद्यार्थ्याने या यादीत आपले नाव आहे अथवा नाही याची खात्री करावी. तेच अर्जात नमूद करावे. चुकीची माहिती दिल्यास कारवाई होणार.
या चाचणी परीक्षेचा आधार उपलब्ध पदसंख्या राहील. राज्यातील शिक्षण सेवक व शिक्षक यांच्या रिक्त पदांची माहिती, विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदूनामावली नुसार पवित्र या संगणकीय प्रणाली मार्फत प्रसिद्ध होणार. परीक्षा माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असणार. भाषिक क्षमता ( मराठी व इंग्रजी ) यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील. म्हणून उमेदवारांनीइंग्रजी – मराठी अथवा इंग्रजी – उर्दू यापैकी एक माध्यम अर्ज दाखल करतांना नमूद करणे आवश्यक आहे. प्रश्नांचे भाषांतर किंवा अर्थाबाबत काही संदिग्धता असल्यास इंग्रजी भाषेतील प्रश्न अंतिम समजल्या जाणार आहे. परीक्षेचे माध्यम केवळ चाचणी पुरते राहणार.
ही परीक्षा २०० गुणांची राहणार. अभियोग्यता परीक्षेत १२० प्रश्नावर १२० गुण तर बुद्धिमत्ता परीक्षेत ८० प्रश्नावर ८० गुण ठेवण्यात आले आहे. अभियोग्यता या प्रकारात गणित क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता व अन्य घटक यावर प्रश्न राहतील. बुद्धिमत्ता घटकात आकलन, वर्गीकरण, तर्क, अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा व अन्य घटक राहणार. विषय ज्ञानावर परीक्षा होणार नाही. परीक्षा कालावधी दोन तासांचा असणार आहे. नियुक्त करायच्या रिक्त जागंचा तपशील पवित्र प्रणाली नुसार राहणार.