नागपूर : गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी सरीसृप विषयात संशोधन केले. सोबतच त्यांनी सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. त्यामुळे त्यांचीचर्चा होत आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि इशान अग्रवाल या तरुण संशोधकांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेल्या अति-दुर्गम भागातील रहिवाश्यांच्या आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घेतला.
याच सह्याद्रीच्या कुशीतून त्यांनी अनेक दुर्मिळ सरीसृपांचा शोध लावला आहे आणि या संशोधनासाठी अनेकदा त्यांना स्थानिकांची मदत झाली आहे. त्यामुळेच सह्याद्री व्याघ्र राखीव, महाराष्ट्र वनविभाग आणि नेचर कन्झर्वेशन सोसायटी यांच्या सहकार्यातून ‘जीवनमित्र’ आरोग्य शिबीर आयोजित केले. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील चांदोली वनक्षेत्रातील उखळू गाव, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील हेळवाक वनक्षेत्रातील मळे, कोळणे, पाथरपुंज अशा दुर्गम गावांमध्ये शिबीर घेतले. पाचगणीचे बेलएअर रुग्णालय आणि कोल्हापूरमधील ट्युलीप रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी ४३४ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. यात स्थानिक गावकऱ्यांसह वनमजूर, वनकर्मचारी सहभागी होते.
या दुर्गम गावांमधे मूलभूत प्राथमिक वैद्यकीय सेवा सुविधांचा अभाव आहे ही बाब लक्षात घेऊन ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनने हे शिबीर आयोजीत करण्यासाठी पुढाकार घेतला. चांदोली आणि हेळवाक या दुर्गम भागातील वनक्षेत्रात वनसंरक्षणाचे काम करणाऱ्या वनमजूरांना वैद्यकीय मदत मिळावी म्हणून ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनकडून या भागातील वनमजूरांना प्रथमोपचार पेटीचे वाटप करण्यात आले. तसेच फाऊंडेशनकडून चांदोली रेंजमधील वनमजूरांना पादत्राणे वाटप करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन सह्याद्री व्याघ्र राखीवचे उपवनसंरक्षक जी. एन. पाटोळे, वनक्षेत्रपाल एन. नलवडे, उखळू गावच्या सरपंच भाग्यश्री थोटपळ, ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक अक्षय खांडेकर, कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक स्वप्निल पवार आणि नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष तबरेज खान यांच्या उपस्थितीत झाले.