नागपूर : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ठाणे खाडीला रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या घोषणेमुळे ठाणे खाडीला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. देशभरातील महानगरातील विशेषत: मुंबई महानगर प्रदेशातील अशा प्रकारचा दर्जा मिळालेली ही पहिलीच पाणथळ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याच्या कांदळवन कक्षाने ठाणे खाडीला रामसर दर्जा मिळावा यासाठी ८ जुलै २०२१ ला प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव राज्याच्या पर्यावरण व वातावरण बदल मंत्रालयाने ९ डिसेंबर २०२१ ला मंजूर केला. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयास राज्य शासनातर्फे पाठवण्यात आला होता.

रामसर स्थळ घोषित करण्यासाठी ९ निकषांची पूर्तता करावी लागते. त्यातील ७ निकषांची पूर्तता ठाणे खाडीने केली आहे. स्थलांतरित पक्ष्यांना त्यांच्या प्रजननाच्या अधिवासापर्यंत पोहोचणे, मध्ये थांबा घेणे आणि हिवाळय़ातील अधिवास या कारणांसाठी ठाणे खाडी हा मध्य आशियाई स्थलांतर मार्ग आहे. लेसर फ्लेमिंगो, ग्रेटर फ्लेमिंगो, इतर हजारो रहिवासी आणि स्थलांतरित पाणपक्षी तसेच स्थलांतरित लोकांच्या संख्येमुळे हा अधिवास जागतिक स्तरावर उल्लेखनीय आहे. हे ठिकाण महत्त्वाचे पक्षी क्षेत्र म्हणूनदेखील ओळखले गेले आहे. खाडीमध्ये २०२ पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. त्यातील काही संकटग्रस्त आहेत. ठाणे खाडीच्या दोन्ही किनारी कांदळवने असून देशात आढळणाऱ्या एकूण खारफुटींपैकी २० टक्के प्रजाती येथे आढळतात. रामसर क्षेत्रफळ..

१६९०.५ हेक्टर हे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याभोवतीचे ४ हजार ८३२ हेक्टर क्षेत्र पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील भाग म्हणून अधिसूचित केले आहे. नाशिक जिल्ह्यातील ८००.९६ हेक्टर नांदूरमाध्यमेश्वर आणि बुलढाणा जिल्ह्यातील ४२७ हेक्टर लोणार सरोवरला २०२० मध्येच रामसर दर्जा देण्यात आला आहे.

रामसर क्षेत्रफळ..

१६९०.५ हेक्टर हे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याभोवतीचे ४ हजार ८३२ हेक्टर क्षेत्र पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील भाग म्हणून अधिसूचित केले आहे. नाशिक जिल्ह्यातील ८००.९६ हेक्टर नांदूरमाध्यमेश्वर आणि बुलढाणा जिल्ह्यातील ४२७ हेक्टर लोणार सरोवरला २०२० मध्येच रामसर दर्जा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात तीन स्थळे..

देशातील १५ पाणथळ जागांना नुकताच रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला. महिनाभराच्या आत आणखी ११ रामसर स्थळ घोषित करण्यात आली. जगातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता २ हजार ४५३ झाली असून यात भारतातील ७५ तर, महाराष्ट्रातील तीन आहेत.

जागतिक जैवविविधतेतील योगदानाबाबत आता ठाणे खाडीचे मूल्य ओळखले जाईल. आंतरराष्ट्रीय मानकानुसार आम्ही या क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी आणि जैवविविधता कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी वचनबद्ध आहोत. रामसर स्थळ आणि  पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषणा या दोन्ही गोष्टी या ठिकाणाच्या संरक्षणास हातभार लावतात.

– वीरेंद्र तिवारी, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष

ठाणे खाडीला रामसर स्थळ घोषित करणे महत्त्वाचे आहे. कारण ते केवळ भारतातील नाही तर, आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या देशातील सर्वात मोठय़ा पाणथळ जागेपैकी एक आहे. हा प्रदेश नि:संशयपणे जैवविविधतेची उच्च क्षमता असलेले पर्यावरणीय क्षेत्र आहे. रामसर स्थळाचा दर्जा मिळाल्याने या क्षेत्राचे संरक्षण होईल.

-डॉ. अफ्रोज अहमद, पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या राष्ट्रीय पाणथळ जागा समितीचे माजी सदस्य

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane declared ramsar site india first background international importance ysh
First published on: 14-08-2022 at 00:02 IST