मध्य भारतातील नामवंत शासकीय विज्ञान संस्थेला दुबळे करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संस्थेमध्ये आधीच कर्मचाऱ्यांची वानवा असताना येथील तृतीय आणि काही चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना ‘बीएलओ’ कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आल्याने प्रयोगशाळा बंद पडल्या आहेत. कर्मचाऱ्यांअभावी विद्यार्थ्यांना प्रयोगासाठी आवश्यक असलेले उपकरण आणि साहित्य मिळत नसून आता प्राध्यापकांना कारकुनी कामे करावी लागत आहेत.

हेही वाचा >>> सूरजागड लोहखाणीतून होणाऱ्या जडवाहतुकीसाठी ‘माइनिंग कॉरिडॉर’ – पालकमंत्री फडणवीस

शासकीय विज्ञान संस्था ही मध्य भारतातील एक नामवंत संस्था आहे. मात्र, मागील काही वर्षांत संस्थेचा आलेख उतरत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या देशभरातील संस्थांच्या क्रमवारीतही शासकीय विज्ञान संस्थेची कामगिरी आधीच्या तुलनेत घसरली आहे. काही दिवसांआधीच ग्रंथालय आणि वसतिगृहाची दुरवस्था समोर आली होती. लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेले प्रशस्त ग्रंथालय कर्मचाऱ्यांअभावी बंद पडून होते. आता पुन्हा येथील कर्मचाऱ्यांना ‘बीएलओ’ कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. शासकीय विज्ञान संस्थेतील जवळपास बारा ते पंधरा कर्मचारी तेथे सेवा देत आहेत. यातील बहूतांश कर्मचारी हे प्रयोगशाळेत काम करणारे होते. आता कर्मचारीच नसल्याचे प्रयोगशाळा बंद पडल्या आहेत. विज्ञान संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळाच मिळत नसेत तर त्यांनी प्रात्यक्षिक ज्ञान कसे घ्यावे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कर्मचारी नसल्याने अनेकदा प्राध्यापकांना सकाळी येऊन प्रयोगशाळा उघडावी लागते. मात्र, येथील साहित्य आणि उपकरणांची माहिती त्यांना नसते. प्राध्यापकांवर अध्यापन सोडून कारकुनी कामे करण्याची वेळ आली आहे.