करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्यात करोना निर्बंधात सूट देण्यात आली होती. दरम्यान, राज्याला आता करोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता सतावत आहे. राज्य सरकारने करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाय-योजणा राबवल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा करोना निर्बंध लावले जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान, नागपुरात करोनाची तिसरी लाट आल्याचे उर्जामंत्री नितिन राऊत यांनी म्हटले आहे. तसेच येत्या दोन ते तीन दिवसात निर्बंध लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नितिन राऊत म्हणाले, “रुग्णांची संख्या वाढते तेव्हा नवीन लाटेची चाहूल लागते. करोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेता. शहरामध्ये आणि ग्रामिण विभागामध्ये पुन्हा कडक निर्बंध लावावे लागणार आहेत. आतापर्यंत आकडेवारी एकेरी होती. मात्र आता ती दोन नंबरी झाली आहे. १३ पॉझिटिव्ह रुग्ण आज सापडले आहेत. तिसऱ्या लाटेने आपलं पाऊल जिल्ह्यामध्ये टाकलं आहे. त्यामुळे काही कडक निर्णय आम्हाला घ्यावे लागतील.”

नागपुरात करोना निर्बंधाचे स्वरुप कसे असेल, हे देखील राऊत यांनी सांगितले आहे. राऊत म्हणाले, “रेस्टॉरंटच्या वेळा आठ वाजेपर्यंत करण्यात येतील. तेसेच दुकाणांच्या वेळा चार वाजेपर्यंच कराव्या लागणार आहेत. तसेच विकेण्डला शनिवार, रविवार बाजारपेठा बंद ठेवाव्या लागणार आहेत. उत्सवांच्या काळामध्ये गर्दी वाढू नये म्हणून आम्ही जनतेला आवाहन केले आहे.”

हेही वाचा- “गर्दी करणारे राजकीय, धार्मिक कार्यक्रम नकोच”, मुख्यमंत्र्यांचं राज्यातील पक्ष-संघटनांना आवाहन

सर्व घटकातील, मीडिया, हॉटेल मालक आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन दोन ते तीन दिवसांमध्ये निर्बंध लागू करण्यात येतील, असे नितिन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात ३ हजार ६३६ नवीन करोनाबाधितांची नोंद

राज्यात आज दिवसभरात ३ हजार ६३६ नवीन करोनाबाधित आढळले असून, ५ हजार ९८८ जण करोनामधून बरे झाले आहेत. याचबरोबर, ३७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.