देवळी शहराशी संपर्काचे माध्यम असलेला यशोदा नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे कोसळला. परिणामी, सहा गावांचा संपर्क तुटला आहे.

देवळी डिगडोह मार्गावर यशोदा नदीवरील रस्त्यात छोटा पूल आहे. सोमवारी रात्री जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. देवळी येथेही असाच पाऊस झाल्याने बरीच पडझड झाली. यशोदा नदीवर बांधलेला पूल या पावसात खचला. त्यामुळे डिगडोह, नागझरी, मुरदगाव, येसगाव व अन्य गावांचा देवळीशी संपर्क तुटला. याच मार्गावरून विद्यार्थी, शेतकरी देवळीत जाणे, येणे करीत असतात.

मात्र, आज कोणीही देवळीत येवू शकले नाही. वीस वर्षापूर्वी हा पूल बांधण्यात आला होता. त्यानंतर गत काही वर्षात काहीच डागडूजी झाली नाही. हा मार्ग लगेच सुरू व्हावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. देवळीचे तहसीलदार सरवदे यांच्याशी याबाबत संपर्क होऊ शकला नाही.