सरसंघचालकांच्या उद्बोधनाकडे लक्ष
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पारंपरिक विजयादशमी उत्सव उद्या शुक्रवारी करोनामुळे मर्यादित स्वयंसेवकांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता रेशीमबाग मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे भाषण असून ते देशातील विद्यमान राजकीय परिस्थितीवर तसेच केंद्राच्या कामगिरीवर काय भाष्य करणार, याकडे देशाचे लक्ष असणार आहे.
मुख्य सोहळा मर्यादित स्वरूपाचा असला तरी शहरातील ४० मैदानात स्वयंसेवक गणवेशात गोळा होणार असून तेथे त्यांना सरसंघचालकांचे भाषण ऑनलाईन ऐकता येणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव रेशीमबाग मैदानावर साजरा के ला जातो. दोन वर्षांपासून करोनामुळे त्याचे स्वरूप मर्यादित झाले आहे. यावर्षी रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात २०० स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे भाषण ऑनलाईन ऐकता येणार आहे. पथसंचालन व कवायतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
भारतीय किसान संघ आणि भारतीय मजदूर संघ या संघाशी संबंधित दोन्ही संघटनांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात भूमिका घेतली आहे. उत्तरप्रदेशात शेतकरी आंदोलन चिघळले आहे. तसेच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना पोहचत असलेली झळ तसेच चीन, पाकिस्तानची भूमिका यावर सरसंघचालक काय भाष्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भांडार विभागात गणवेश शिल्लक नाही
विजयादशमी उत्सवात सहभागी होण्यासाठी १२ भागातील ४० नगरांमध्ये त्या त्या भागातील मैदानात व्यवस्था करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपशी संबंधित अनेक कार्यकर्ते या उत्सवात सहभागी होणार आहेत. शिवाय शहर भाजपने यासंदर्भात पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच विविध आघाड्यांतील प्रमुख कार्यकत्र्यांना गणवेशात उपस्थित राहणाचे आदेश जारी केल्यामुळे गेल्या तीन चार दिवसांपासून संघाच्या गणवेशाची मागणी वाढली आहे. कधीही संघात न गेलेले अनेक भाजपचे कार्यकर्ते गणवेश खरेदी करीत असल्याने संघाच्या भांडार विभागात गणवेश शिल्लक उरलेले नाही.
